कत्तलखान्यात दीड कोटीचा ‘मलिदा’
By Admin | Updated: August 27, 2015 00:20 IST2015-08-27T00:20:24+5:302015-08-27T00:20:24+5:30
आघाडीच्या बैठकीत वादंग : पैसे खाल्लेल्यांची नावे जाहीर करण्यावरून नगरसेवकांत जुंपली; आजच्या सभेकडे लक्ष

कत्तलखान्यात दीड कोटीचा ‘मलिदा’
कोल्हापूर : नेहरुनगर परिसरात बांधण्यात येत असलेल्या ‘बीओटी तत्त्वा’वरील कत्तलखाना मंजुरी प्रकरणावरून बुधवारी महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीच्या बैठकीत नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. या प्रकरणात १ कोटी ४७ लाख रुपये कोणी घेतले, त्यांची नावे जाहीर करावीत, अशी मागणी करत नगरसेवकांनी बैठकीत चांगलाच गदारोळ केला. हातघाईवर आलेले हे प्रकरण काहीजणांनी मध्यस्थी करत शांत केले. महानगरपालिकेची तहकूब सभा आज, गुरुवारी होत आहे. त्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आघाडीच्या नगरसेवकांची बुधवारी सायंकाळी महापालिकेत ही बैठक झाली. महासभेच्या पुरवणी विषयपत्रिकेवरील अठरा क्रमांकाचा विषय या गदारोळास कारणीभूत ठरला. कत्तलखाना उभारणीकरिता भूसंपादनास शासनाच्या रेडिरेकनर दराप्रमाणे होणारा निधी पुनर्वर्गीकरण करून देण्याबाबतचा हा सदस्य ठराव आहे. त्यावर आघाडी बैठकीत चर्चा सुरू होताच नगरसेवकांनी गदारोळ सुरू केला. हा विषय कशासाठी मंजूर करायचा, असा सवालच काहींनी उपस्थित केला. या प्रकरणात महासभेसाठी ५० लाख आणि वैयक्तिक ९८ लाख रुपये कोणीतरी घेतल्याची चर्चा सुरू आहे. हे पैसे कोणी घेतले त्यांची नावे सांगा, अशी थेट मागणीच बैठकीत अनेकांनी लावून धरली.त्यातच कोणीतरी ‘नेत्यांच्या आदेशाने हा ठराव मंजूर करायचा आहे,’ असे सांगताच नेत्यांची नावे या प्रकरणात घेतली जाऊ नयेत, अशी भूमिका काही नगरसेवकांनी घेतली. त्यामुळे गदारोळात भर पडली. आदिल फरास, राजेश लाटकर आणि सुरेश ढोणुक्षे यांच्यात जोरदार खडाजंगी उडाली. त्याचवेळी प्रा. जयंत पाटील आणि अजित पोवार यांच्यातही जुंपली. विजय सूर्यवंशी यांनीही यात हात धुऊन घेत पैसे घेणाऱ्यांची आधी नावे सांगा, अशी जोरदार मागणी लावून धरली. महासभेसाठी घेतलेले ५० लाख का वाटले नाहीत, याचा जाबही अनेकांनी ‘कारभाऱ्यां’ना विचारला.
ज्यांनी पैसे घेतले त्यांनी घेतले, आता संबंधित ठेकेदाराचे यापुढे नुकसान होऊ नये म्हणून गुरुवारच्या सभेपुढे प्रस्ताव ठेवला असून तो मंजूर करावा, अशी विनंती कारभारी नगरसेवकांनी केली; परंतु अनेकांनी आधी वाटप करा, मगच बघू, अशी आक्रमक भूमिका घेतली. नगरसेवकांना समजावण्याचा बराच प्रयत्न झाला, पण कोणीही तो मान्य केला नाही. गेल्या काही दिवसांपासून महापालिकेत केशवराव भोसले नाट्यगृह सुशोभीकरण, नगरोत्थान रस्ते आणि सीसीटीव्ही प्रकल्पातील मलिद्यावरून नगरसेवकांमध्ये संशयाचे आणि संतापाचे वातावरण आहे. त्यातील मलिदा पोहोचला नसल्याने अनेकजण अस्वस्थ होते. त्यामुळेच कत्तलखान्याच्या विषयावरून वादाला तोंड फुटले. नगरसेवक एकमेकांसमोर ठाकले. शेवटी तणावाच्या वातावरणातच बैठक गुंडाळावी लागली. त्यामुळे गुरुवारच्या सभेत काय होणार, याकडे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)