शिंदेवाडीच्या ‘बिनघंटे’च्या शाळेची घंटा बंदच
By Admin | Updated: September 6, 2015 23:29 IST2015-09-06T23:29:29+5:302015-09-06T23:29:29+5:30
वाद न्यायालयात : मुले शाळेत पाठविणे बंद; मुलांचे दाखले द्या : पालकांची भूमिका

शिंदेवाडीच्या ‘बिनघंटे’च्या शाळेची घंटा बंदच
गारगोटी : राज्यात ‘बिनघंटे’ची शाळा म्हणून नावारूपास आलेली भुदरगड तालुक्यातील शिंदेवाडी येथील प्राथमिक शाळा सध्या मुख्याध्यापिका विरुद्ध प्रशासन, ग्रामस्थ आणि सहायक शिक्षक अशा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तर ग्रामस्थांनी २४ आॅगस्टपासून आपले पाल्य या शाळेत पाठविणे बंद करून एक वेगळाच ‘एल्गार’ केला आहे.
सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांसाठी खुली ठेवून त्यांचा बौद्धिक व सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अहोरात्र काम करून ही शाळा येथील देवेकर व गुरव या दोन शिक्षकांनी नावारूपाला आणली. नवनवीन उपक्रमांसह शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवित येथील विद्यार्थ्यांनीही चांगलीच प्रगती केली. याची दखल जिल्हा परिषद शिक्षण विभागाने घेतली. तर राज्यातील अनेक शाळा, अधिकारी यांनी वेळोवेळी या शाळेस भेटी देऊन बिनघंटेची संकल्पना समजून घेतली. शाळेचा नावलौकिक आणि शिक्षकांचे प्रामाणिक कष्ट पाहून गारगोटी येथील पालकांनी आपल्या मुलांना या शाळेत घालण्यास प्राधान्य दिले. शिंदेवाडी व्यतिरिक्त गारगोटी व परिसरातील विद्यार्थी या शाळेत येऊ लागले. त्याचा परिणाम पट संख्येवर झाला. पटसंख्या वाढल्याने ९ जानेवारी २0१५ ला समायोजन पद्धतीने सुनीता कालेकर यांची मुख्याध्यापक म्हणून नेमणूक झाली; पण त्यांच्या कार्यप्रणालीवर ग्रामस्थ नाराज होते. त्यांनी त्यांच्या बदलीची मागणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली. त्यांची कार्यपद्धती तपासण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश दिले गेले.
या तपासणीत कालेकर दोषी आढळल्या की नाही, हे गुलदस्त्यात आहे. मात्र, त्यांच्यावर सहकारी शिक्षकांशी वाद घालणे, विद्यार्थ्यांना शिकविण्यात कुचराई करणे, जाणीवपूर्वक शाळेतील उपक्रम बंद पाडणे, असे आरोप होते. त्यांच्यावर शिक्षण विभागाने कारवाई केल्यानंतर त्या न्यायालयात गेल्या. त्यांनी सरकारी शिक्षक शालेय व्यवस्थापन समिती यांच्यासह आणखी चार अधिकाऱ्यांना न्यायालयात खेचले.
सध्या ग्रामस्थ व मुख्याध्यापिका सुनीता कालेकर यांच्यातील वाद इतका विकोपाला गेला आहे की, ग्रामस्थांनी न्यायालयाचा मान राखत कालेकर यांची बदली करा म्हणण्या ऐवजी आपल्या पाल्यांचे दाखले द्या, असा सूर लावून सोमवारपासून एकाही विद्यार्थ्यांला शाळेत पाठविले नाही. शिवाय या मुख्याध्यापिकेची बदली झाल्याखेरीज मुले शाळेत पाठवणार नाही, अशी ठाम भूमिका पालकांनी घेतली आहे.
नावाजलेल्या शाळेची वाताहत होत असलेली पाहून पालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत गटशिक्षणाधिकारी एम. एस. मांडे यांच्याशी संपर्क साभला असता ते म्हणाले, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तपास अहवाल पाठविला असून, ते योग्य तो निर्णय घेतील. याबाबत थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. त्या दूर करून लवकर निर्णय होईल. गटविकास अधिकारी आणि जिल्हा परिषद सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर यांनी ग्रामस्थांना मुले शाळेत पाठविण्याची विनंती केली आहे; पण ग्रामस्थ आपल्या मतावर ठाम आहेत. (वार्ताहर)