इतिहासाचे नव्याने संशोधन होणे गरजेचे : अरुण भोसले
By Admin | Updated: January 13, 2015 00:07 IST2015-01-12T23:20:12+5:302015-01-13T00:07:11+5:30
पाश्चिमात्य देशात ऐतिहासिक गोष्टीचे संकलन केले जाते. भारतातही ऐतिहासिक स्थळांचे जतन होणे गरजेचे आहे.

इतिहासाचे नव्याने संशोधन होणे गरजेचे : अरुण भोसले
आष्टा : ब्र्रिटिशकालीन भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३३ टक्के क्षेत्र व २५ टक्के लोकसंख्येने व्यापलेल्या संस्थानाच्या इतिहासाचे आजपर्यंत मोठ्या प्रमाणावर संशोधन झाले आहे. मात्र नव्याने उपलब्ध होणाऱ्या कागदपत्रांच्या आधारावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून संशोधन होणे गरजेचे आहे. नव्या संशोधकांनी संधी समजून संस्थानिकांच्या इतिहासावर प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण विभागाचे संचालक प्रा. डॉ. अरुण भोसले यांनी केले.
आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजच्या इतिहास विभागाच्यावतीने ब्रिटिशकालीन भारताच्या संस्थांनी राज्यातील ऐतिहासिक संसाधने या विषयावर आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. भोसले बोलत होते.डॉ. आर. डी. सावंत म्हणाले, पाश्चिमात्य देशात ऐतिहासिक गोष्टीचे संकलन केले जाते. भारतातही ऐतिहासिक स्थळांचे जतन होणे गरजेचे आहे. माजी प्राचार्य व्ही. डी. माने म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील, शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव सर्वत्र होता, तर डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले की, शाहू महाराज केवळ संस्थानिक नव्हते, तर एक समाज क्रांतिकारक होते.पुणे विद्यापीठातील प्रा. डॉ. दीपक गायकवाड, कोल्हापूरचे डॉ. अवनीश पाटील, विजापूरचे डॉ. अब्दुलगणी इमरतवाले, प्रा. डॉ. एम. पी. पाटील यांनी मार्गदर्शन केले. या चर्चासत्रात देशातील १५० प्राध्यापक संशोधक विद्यार्थी सहभागी झाले होते.प्राचार्य डॉ. विलास काळे यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. प्रमोद ओलेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शशिकांत मोहिते यांनी आभार मानले. (वार्ताहर)