इतिहासाचा फेरआढावा घेऊन पुनर्लेखन गरजेचे

By Admin | Updated: March 11, 2015 00:08 IST2015-03-10T23:51:19+5:302015-03-11T00:08:37+5:30

सुमित्रा कुलकर्णी : विद्यापीठातील इतिहास विभागाच्या चर्चासत्राला प्रारंभ

History needs to be re-written with a round-trip | इतिहासाचा फेरआढावा घेऊन पुनर्लेखन गरजेचे

इतिहासाचा फेरआढावा घेऊन पुनर्लेखन गरजेचे

कोल्हापूर : मराठा इतिहासाच्या तथ्यांचे सैद्धांतिकीकरण होणे आवश्यक आहे. त्या माध्यमातून इतिहासाच्या बळकटीकरणासाठी इतिहास संशोधकांनी काम करावे, शिवाय त्यांनी इतिहासाचा फेरआढावा घेऊन त्याचे पुनर्लेखन करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ मराठा इतिहास संशोधक प्रा. डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनी मंगळवारी येथे केले.विद्यापीठातील छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अभ्यास केंद्रातर्फे आयोजित ‘मराठा इतिहास संशोधनातील प्रवाह’ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. मानव्यशास्त्र सभागृहातील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक भोईटे होते.डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, मराठा इतिहास म्हणजे केवळ राजे-महाराजांच्या कालखंडांचा अभ्यास असा संकुचित अर्थ घेऊ नये. त्या कालखंडाचा संपूर्ण भारतीय इतिहासाच्या परिप्रेक्ष्यातून सर्वंकष वेध अभिप्रेत आहे. त्यादृष्टीने पोर्तुगीज, फ्रेंच, जर्मन आणि ब्रिटिश संशोधकांनी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या ऐतिहासिक ऐवजांचे परिशीलन, त्या व्यतिरिक्त उपलब्ध स्रोत, संसाधनांच्या आधारावर इतिहासाचा फेरआढावा घेऊन पुनर्लेखन करून वस्तुनिष्ठ इतिहास मांडण्याकडे संशोधकांचा कटाक्ष असावा.
डॉ. भोईटे म्हणाले, या राष्ट्रीय चर्चासत्राच्या माध्यमातून इतिहासाच्या संशोधनाकडे पाहण्याची नवी दृष्टी संशोधकांना प्राप्त होईल.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. माधव पाटील, बी. एन. सरदेसाई, जी. टी. कुलकर्णी, अमर सुतार, सदाशिव शिवदे, पद्मजा पाटील, नंदा पारेकर, अवनिश पाटील, आदी उपस्थित होते. नीलांबरी जगताप यांनी स्वागत केले. लीना ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. एम. ए. लोहार यांनी आभार मानले.

Web Title: History needs to be re-written with a round-trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.