ऐतिहासिक विजयदुर्गची तटबंदी ढासळतेय...
By Admin | Updated: December 19, 2014 00:45 IST2014-12-19T00:44:53+5:302014-12-19T00:45:13+5:30
जलदुर्र्गाचा बादशहा : ८00 वर्षांचा इतिहास; मराठा आरमाराची गाथा हा किल्ला सांगतो

ऐतिहासिक विजयदुर्गची तटबंदी ढासळतेय...
अयोध्याप्रसाद गावकर - पुरळ -मराठ्यांच्या आरमाराची विजयी गाथा सांगणारा, कोकण किनारपट्टीवरील शान, नावाप्रमाणेच विजयी झेंडा फडकवणारा, जलदुर्गांचा बादशहा, ८०० वर्षांचा इतिहास असलेल्या ऐतिहासिक विजयदुर्ग किल्ल्याकडे शासन व पुरातत्व विभागही दुर्लक्ष करीत आहे.
या किल्ल्याची इंग्रजांनाही एवढी आस होती की, केवळ फितुरीमुळेच पेशव्यांच्या मदतीने आंग्रेंचा पाडाव करून हा किल्ला त्यांनी जिंकला. पेशव्यांबरोबर झालेल्या तहानुसार विजयदुर्गच्या बदली बाणकोटजवळची दहा गावे द्यायला ते तयार झाले होते. सध्या मात्र ढासळणाऱ्या तटबंदीमुळे या किल्ल्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंग्रज, पोर्तुगीज, डच, आदी परकीय शत्रूंच्या तोफांचा महाभयंकर मारा होऊनही वास्तूचा एकही दगड ज्या किल्ल्याने हलू दिला नाही, असा मिश्रदुर्ग म्हणजे विजयदुर्ग. इ.स. १२०५ मध्ये शिलाहार घराण्यातील राजा भोज याने कोकण प्रांताचा मुख्य असलेला मिर्झावल्ली बेग यांच्या देखरेखेखाली या किल्ल्याचे बांधकाम केले. १६५३ मध्ये छत्रपती शिवरायांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकला. मराठा आरमाराची स्थापना झाल्यावर १७१८ पासून या किल्ल्यावरच्या विजयी गाथेला सुरुवात झाली. इंग्रज गव्हर्नर बून, कॅप्टन वॉल्टर ब्राऊन, कमांडर जॉर्ज बागवेल, आदी बलाढ्य शक्तींना या किल्ल्याच्या दुर्गरचनेमुळे केवळ गनिमी काव्याने मराठ्यांनी जेरीस आणले; पण फितुरीमुळे हा किल्ला इंग्रजांच्या आणि नंतर पेशव्यांच्या ताब्यात गेला. १७१८ पासून झालेल्या पहिल्या परकीय शक्तीच्या हल्ल्यापासून ते किल्ला इंग्रजांच्या ताब्यात जाईपर्यंत म्हणजे १७५६ पर्यंतचा इतिहास जाणून घेतला तर आजही मराठ्यांच्या पराक्रमाने किल्ल्याच्या रचनेमुळे आणि भक्कम बांधकामामुळे अंगावर रोमांच येतात.
या स्फूर्तिदायक विजयदुर्ग किल्ल्याची सुरुवात होते ती गोमुख दरवाजापासून. छत्रपती शिवरायांनी आदिलशहाकडून हा किल्ला जिंकून घेतल्यावर जी बाहेरची चिकलबंदी तटबंदी बांधली, त्याचवेळी या गोमुखी दरवाजाची बांधणी केली. या किल्ल्यात एक मोठे भुयार असून, तेथून जाणारा खुब लढा तोफा, बारा बुरूज, पेशवेकालीन वाड्याकडे जाणारे भुयार, भवानी मातेचे मंदिर, सैनिकांची निवासस्थाने, मारुती मंदिर, आदी वास्तुंमुळे विजयदुर्ग किल्ला आजही ऐतिहासिक आठवणी सांगत उभा आहे. छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मराठा आरमारांची गाथा हा किल्ला सांगतो.
दोन लाख पर्यटक
या किल्ल्यामध्ये नोव्हेंबर ते मे या पर्यटन हंगामामध्ये सुमारे दोन लाख पर्यटक येत असतात. यामध्ये शैक्षणिक सहली जास्त प्रमाणात येत असतात. त्यामुळे विजयदुर्गमध्ये पर्यटन व्यवसायही वाढला आहे. आठशे वर्षांनंतरही विजयदुर्ग किल्ल्याचे महत्त्व वाढतच चालले असून, त्यामुळे परिसरातील गावांना अनन्यसाधारण महत्त्वही आले आहे.
पायाभूत सुविधांचा अभाव
हा किल्ला ३६ एकर जमिनीमध्ये व्यापलेला आहे. या किल्ल्याचे संवर्धन, जतन, ऐतिहासिकपणा पुरातत्व विभागाने जपला पाहिजे. या किल्ल्यावर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले असून, अजूनही केले जाते. ऐतिहासिकपणाने अभेद्य असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या सुविधा येथे उपलब्ध झाल्या तर देश-परदेशातील पर्यटकांची संख्या निश्चितच वाढू शकते.
पायाभूत सुविधांचा अभाव
हा किल्ला ३६ एकर जमिनीमध्ये व्यापलेला आहे. या किल्ल्याचे संवर्धन, जतन, ऐतिहासिकपणा पुरातत्व विभागाने जपला पाहिजे. या किल्ल्यावर अनेक मराठी, हिंदी चित्रपटांचे चित्रीकरणही झाले असून, अजूनही केले जाते. ऐतिहासिकपणाने अभेद्य असलेल्या विजयदुर्ग किल्ल्याच्या परिसरात पर्यटकांच्या दृष्टीने पायाभूत सुविधांचा अभाव आहे. या सुविधा येथे उपलब्ध झाल्या तर देश-परदेशातील पर्यटकांची संख्या निश्चितच वाढू शकते.