जिद्दीच्या शिक्षणाला सर्वोच्च पुरस्कार

By Admin | Updated: August 26, 2015 23:21 IST2015-08-26T23:21:14+5:302015-08-26T23:21:14+5:30

शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये गडहिंग्लज, आजरा, शाहूवाडी आणि करवीर तालुक्यांतील शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या कार्याचा घेतलेला आढावा आजपासून...आदर्श शिक्षक

Highest Award for Dying Education | जिद्दीच्या शिक्षणाला सर्वोच्च पुरस्कार

जिद्दीच्या शिक्षणाला सर्वोच्च पुरस्कार

कोल्हापूर जिल्ह्यातील चार प्राथमिक शिक्षकांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या पुरस्कारामध्ये गडहिंग्लज, आजरा, शाहूवाडी आणि करवीर तालुक्यांतील शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांच्या कार्याचा घेतलेला आढावा आजपासून...आदर्श शिक्षक
राम मगदूम -गडहिंग्लज
गावात शाळा नाही म्हणून सातवीनंतर ‘ती’ची शाळा सुटली. त्यानंतर चार वर्षे ‘ती’ घरीच राहिली. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिचे लग्न झाले. त्यानंतर सासरवाडीतील शाळेत पुन्हा आठवीला प्रवेश घेतला. नववीत असतानाच मुलगा झाल्यामुळे वर्षाचा खंड पडला. त्यानंतर दहावी, डी.एड्, बी.ए., एम.ए., बी.एड्., एम.एड्., पर्यंतचे शिक्षण प्रापंचिक जबाबदारी आणि नोकरी सांभाळत पूर्ण केले. ३० वर्षांच्या सेवेनंतर ‘ती’ला आता ‘राष्ट्रपती’ पुरस्कार जाहीर झाला आहे. जिद्दीने शिक्षण घेऊन स्व:कर्तृत्वाने सर्वोच्च पुरस्कार मिळविणाऱ्या दलित समाजातील या जिद्दी महिलेचे नाव आहे...प्रभावती आप्पासाहेब बागी.
कडलगे (ता. गडहिंग्लज) येथील सर्वसामान्य कुटुंबात जन्म झाला. वडील परशराम शंकर बागी हेदेखील पेशाने शिक्षक होते. मात्र, त्या काळी गावात माध्यमिक शाळा आणि वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे त्यांना सातवीलाच शाळा सोडावी लागली. त्यानंतर सोळाव्या वर्षी त्यांचे लग्न झाले. पती आप्पासाहेब हेदेखील प्राथमिक शिक्षक होते.
शिकण्याची तीव्र इच्छा असल्यामुळे त्यांनी सासरवाडी हसूरचंपुतील यशोदाबाई घोरपडे हायस्कूलमध्ये आठवीत प्रवेश घेतला. तब्बल चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा शिक्षण सुरू झाले. मात्र, नववीत शिकत असतानाच त्यांना मुलगा झाला. त्यामुळे पुन्हा वर्षभर शिक्षण थांबले. त्यानंतर दहावीची परीक्षा त्या ६४ टक्क्यांनी उत्तीर्ण झाल्या. त्याचवेळी शिक्षिका होण्याचा निर्णय पक्का झाला.
वर्षाच्या मुलाला माहेरी आईकडे ठेवून कोल्हापूर येथील सन्मित्र अध्यापक विद्यालयात त्यांनी ‘डी.एड्’ची पदविका घेतली. गडहिंग्लजच्या शिवाजी विद्यालयात त्यांना नोकरीची पहिली संधी मिळाली. त्यानंतर हसूरचंपुतील जिल्हा परिषद शाळेत त्यांची नेमणूक झाली. नोकरी सांभाळतच गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयात त्या एम.ए. झाल्या. त्यानंतर बी.एड्. व एम.एड्. या पदव्यादेखील मिळविल्या. अंधश्रद्धा निर्मूलन व साक्षरता अभियानातही त्यांनी काम केले. हसूरचंपुतील तब्बल २२ वर्षांच्या सेवेनंतर पदवीधर शिक्षिका म्हणून त्यांनी दोन वर्षे माद्याळला काम केले. त्यानंतर त्यांना मुख्याध्यापिका म्हणून बढती मिळाली. कृतियुक्त शिक्षणाचा पहिला प्रयोग त्यांनी करंबळीत राबविला. जिल्हास्तरीय नाट्यीकरण स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे बक्षीस सलग चार वर्षे याच शाळेला मिळाले. गतवर्षी समिती भूषण व गुणवत्ता विकास कार्यक्रमात पहिला क्रमांक आणि पुष्पावती चौगुले विश्वस्त निधीचा ‘स्वच्छ-सुंदर शाळा’ पुरस्कारही या शाळेला मिळाला आहे.

२५ वर्षांनंतर गडहिंग्लजला मान
१९६३-६४ मध्ये भीमाप्पा आपय्या चौगुले (नूल), १९७१-७२ मध्ये शंकर तुकाराम देसाई (कौलगे), १९९०-९१ मध्ये दिनकर सदोबा देसाई (लिंगनूर काा नेसरी), २०१४-१५ मध्ये प्रभावती आप्पासाहेब बागी (हसूरचंपू) यांना आदर्श शिक्षक राष्ट्रपती पुरस्कार मिळाला आहे. तब्बल २५ वर्षांनंतर गडहिंग्लज तालुक्याला हा बहुमान मिळाला आहे.


प्रेरणा... घंटानादाची !
१९६४ मध्ये भि. आ. चौगुले यांना गडहिंग्लज तालुक्यातील पहिला राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. त्यांच्या जीवनावर आधारित ‘घंटानाद’ नामक पुस्तक वडिलांनी नोकरी लागली त्यावेळी आपल्याला भेट दिली होती. ‘घंटानादा’ची प्रेरणा आणि वडील परशराम, आई रत्नाबाई, सासू गौराबाई, पती आप्पासाहेब, कुटुंबीय व सहकारी शिक्षकांचे सहकार्य आणि निष्ठेने व प्रामाणिकपणे केलेल्या कामामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे, असे त्या नम्रतापूर्वक सांगतात. त्यांना या अगोदर तालुकास्तरीय व जिल्हास्तरीयही पुरस्कार मिळालेला आहे.

Web Title: Highest Award for Dying Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.