नरके लेख भाग..२
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:23 IST2021-05-19T04:23:54+5:302021-05-19T04:23:54+5:30
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सर्व निवडणुकीत पडद्यामागे राहून अतिशय चाणाक्षपणे नियोजन करणारे कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष व ...

नरके लेख भाग..२
माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या सर्व निवडणुकीत पडद्यामागे राहून अतिशय चाणाक्षपणे नियोजन करणारे कुंभी कासारी सहकारी बँकेचे अध्यक्ष व ‘गोकुळ’चे नूतन संचालक अजित शशिकांत नरके यांना नरके गटाचा ‘चाणक्य’ म्हणून ओळखले जाते. अगदी सावलीप्रमाणे ते चंद्रदीप नरके यांच्यासोबत राहतात, त्यांच्यातील बंधुप्रेम आजच्या तरुण पिढीला आदर्शवत आहे.
स्वर्गीय डी. सी. नरके यांच्याकडून सहकाराचे तर दिवंगत नेते यशवंत एकनाथ पाटील यांच्याकडून अजित नरके यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. ज्येष्ठ नेते अरुण नरके यांच्याकडून कामात सचोटी कशी असावी, तर माजी आमदार चंद्रद्रीप नरके यांच्याकडून जनसंपर्क व विकास कामाचे मिळालेले संस्कार, या सगळ्या शिदोरीवर अजित यांची वाटचाल सुरू आहे. विद्यार्थी दशेपासूनच एक चळवळीतील कार्यकर्ता म्हणून त्यांची जिल्ह्याला ओळख आहे. शिवाजी विद्यापीठ स्टुडंट कौन्सिलच्या निवडणुका १९८९ पासून सलग चार वर्षे चंद्रदीप नरके यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या बळावर जिंकून दाखवल्या. याच माध्यमातून वयाच्या १८ व्या वर्षी अजित नरके यांनी शिवाजी विद्यापीठ स्टुडंड कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवडून येऊन कमी वयात अध्यक्ष पदाचा बहुमान मिळवला.
गेली पंधरा वर्षे ते कुंभी कासारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. शेती, शेतीपूरक व्यवसाय, उद्योजक, महिला उद्योजक यांच्यासह विद्यार्ध्यांंना उच्चशिक्षणासाठी अर्थसाहाय्य करून त्यांच्या जीवनात स्थैर्य आणण्याचे प्रामाणिक काम केले. मध्यंतरी सहकारी संस्था अडचणीत आल्या होत्या. तरीही आपल्या कौशल्याच्या बळावर त्यांनी कुंभी बँक नंबर वन वर ठेवली. मराठा समाजातील तरुण उद्योजक बनला पाहिजे, यासाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाची कर्ज योजना कुंभी बँकेच्या माध्यमातून राबवणारे अजित नरके हे पहिले होते.
कुंभी कासारी शिक्षण प्रसारक मंडळाची धुरा हातात घेतल्यापासून आपला विद्यार्थी उद्याच्या स्पर्धेत कोठे कमी पडणार नाही, याची दक्षताही त्यांनी घेतली आहे. शिक्षण क्षेत्र झपाट्याने बदलत असल्याने त्यानुसार आपल्या शाळा बदलल्या पाहिजेत, यासाठी त्यांचा नेहमी आग्रह असतो. सहकारी संस्थांच्या निवडणंका असो अथवा सार्वत्रिक, प्रत्येक निवडणुकीत नरके गटाची पडद्यामागे राहून अतिशय सूक्ष्म नियोजन करून यशस्वी बांधणी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. ‘गोकुळ’च्या निवडणूकीतही त्यांनी नियोजनबद्धरीत्या प्रचार यंत्रणा राबवली, दूध उत्पादकांना विश्वास दिल्यानेच ते विजयी पॅनेलमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिले. ‘गोकुळ’मध्ये आता त्यांचा सहकारातील अनुभव उपयोगी पडणार आहे. कोणत्या वेळी काय निर्णय घेतला म्हणजे संस्थेबरोबर सभासदांचे हित होईल, याची पक्की जाण अजित नरके यांना असल्याने ‘गोकुळ’च्या यशस्वी वाटचालीत त्यांचे योगदान खूप मोलाचे ठरेल, यात दूध उत्पादकांना शंका नाही.
- मच्छिंद्र मगदूम