कोल्हापूर : 'संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या सभासदांची आर्थिक फसवणूक केल्याचा खटला कागल न्यायालयात सुरू आहे. याबाबत कागल न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे मुश्रीफ यांना दिलासा नाहीच. कागल न्यायालयातील खटला पूर्ण क्षमतेने लढवणार आहे,' असे समरजीत घाटगे यांनी गुरुवारी (दि. २६) राधानगरी धरण येथे प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.मंत्री हसन मुश्रीफ यांनी संताजी घोरपडे साखर कारखान्यातील अपहाराचा मुरगूड पोलिस ठाण्यातील गुन्हा रद्द करावा, अशी मागणी याचिकेद्वारे मुंबई उच्च न्यायालयात केली होती. त्यावर बुधवारी झालेल्या सुनावणीत उच्च न्यायालयाने कागल न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा संदर्भ देऊन उच्च न्यायालयातील याचिका निकाली काढली. यावरून मुश्रीफ यांना क्लीन चीट मिळाल्याची चर्चा सुरू झाली होती. यावर फिर्यादी समरजीत घाटगे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
वाचा - माझ्या गायी परमेश्वराने राखल्या; न्यायालयाच्या निकालानंतर मंत्री मुश्रीफांची प्रतिक्रियाते म्हणाले, 'मुश्रीफ यांना दिलासा मिळालेला नाही. कागल न्यायालयात खटला सुरू आहे. ते न्यायालय याबाबत निर्णय घेईल, असे न्यायाधीशांनी म्हंटले आहे. याचिका रद्द केल्याने गुन्हा रद्द करण्याचा अर्ज आपोआपच निकाली निघाला. कागल न्यायालयात खटला सुरू असून, तो पूर्ण क्षमतेने लढवणार आहे.' मुश्रीफ यांनी सभासदांची ४० कोटींची फसवणूक केल्याचा दावा फिर्यादीत केला आहे.