विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या

By Admin | Updated: June 9, 2014 01:12 IST2014-06-09T01:02:15+5:302014-06-09T01:12:59+5:30

‘रिपाइं’ कार्यकर्त्यांची मागणी : निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे

Hang the Innovators | विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या

विटंबना करणाऱ्यांना फाशी द्या

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची फेसबूकवर आक्षेपार्ह प्रतिमा टाकणाऱ्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी करत थोर पुरुषांची विटंबना रोखू न शकणाऱ्या निष्क्रिय राज्य सरकारने सत्तेतून बाजूला व्हावे, अशी मागणी आज, रविवारी जिल्ह्णातील ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी केली. मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांना पदावर राहण्याची नैतिकता नाही, त्यांनी राजीनामा द्यावा, अशा संतप्त भावनाही कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
डॉ. आंबेडकर यांची विटंबना झाल्याची बातमी वाऱ्यासारखी कोल्हापूर शहरासह शेजारील गावांत पसरली. त्याचे पडसाद ठिकठिकाणी उमटले. कावळा नाका येथे जमा झालेल्या ‘रिपाइं’ कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत घटनेचा निषेध केला. त्यानंतर हा जमाव मध्यवर्ती बसस्थानकमार्गे दसरा चौकातून बिंदू चौकात आला. येथे आल्यानंतर जोरदार घोषणाबाजी सुरू केल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव प्रा. शहाजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांना शांत केले. यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या बिंदू चौक येथील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात झाली.
प्रा. कांबळे म्हणाले, आज घडलेली घटना निंदनीय आहे, अशा प्रवृत्तींना ठेचून काढले पाहिजे. डॉ. आंबेडकर यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. याबाबत शासन कोणती भूमिका घेते, ते पाहून आगामी दोन दिवसांत आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. गावा-गावांत शांततेत बंद करा, असे आवाहनही त्यांनी केले.
‘रिपाइं’(आठवले)चे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर आता डॉ. आंबेडकरांची विटंबना केली, अशा प्रवृत्तीला ठेचून काढले पाहिजे. आंबेडकरी जनतेचा संयम पाहू नका, वेळेत बंधन घाला, अन्यथा जे काही परिणाम होतील, त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्यशासनाची असेल, असा इशाराही त्यांंनी दिला.
मुस्लीम बोर्डिंगचे कादर मलबारी म्हणाले, शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर यांची विटंबना करून या थोर पुरुषांचा अपमान फेसबुकच्या माध्यमातून केला आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर फेसबुकवर बंदी आणावी. चीनप्रमाणे आपल्या देशाने या विघातक यंत्रणेवर बंदी घालावी, अशी जोरदार मागणी करत थोर पुरुषांची विटंबना यापुढे खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
‘रिपाइं’(गवई)चे जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वासराव देशमुख म्हणाले, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगाला एकात्मता व शांततेचा संदेश दिला, त्यांची अशा प्रकारची विटंबना सहन होत नाही. असे कृत्य करणाऱ्या प्रवृत्तीला माफ करू नका. थोर पुरुषांच्या विटंबनेची जबाबदारी स्वीकारून राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही प्रा. देशमुख यांनी केली. दुर्वास कदम, गणी आजरेकर, बाळासाहेब वाशीकर आदींनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. (प्रतिनिधी)

Web Title: Hang the Innovators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.