हापूसला पंधरवड्यात नुकसानभरपाई
By Admin | Updated: May 29, 2015 00:01 IST2015-05-28T23:02:15+5:302015-05-29T00:01:09+5:30
मुख्यमंत्री : मार्गताम्हाणेतील कार्यक्रमात ग्वाही ; कोकणच्या पर्यटन विकासासाठी पाच वर्षांचा आराखडा

हापूसला पंधरवड्यात नुकसानभरपाई
गुहागर : अवकाळी पावसामुळे हापूस आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. नुकसानभरपाई नेमकी कशी द्यावी, याचा अहवाल देण्याची सूचना आपण अधिकाऱ्यांना केली आहे. येत्या पंधरा दिवसांत या भरपाईबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
चिपळूण तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील पद्मावती देवी मंदिराचा जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा फडणवीस यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. वसंतराव भागवत, डॉ. तात्या नातू यांच्या कर्मभूमीत यायला मिळाले हे भाग्यच असल्याचे सांगताना संस्काराच्या भक्कम पायावरच मुख्यमंत्री होता आल्याचे त्यांनी प्रांजळपणे सांगितले.
सर्व प्रकारांची शिल्पे एकत्र करून हे मंदिर बांधले गेले आहे. भारताचा एकसंधपणा यातून दिसतो. हे मंदिर समाज परिवर्तनाचे केंद्र झाले पाहिजे, असे ते म्हणाले. कोकणात भरपूर पाऊस पडूनही शेतीसाठी, फलोत्पादनासाठी उपयोग होत नाही. पावसाचे सर्व पाणी समुद्राला मिळते. त्यासाठी जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून पाण्याची चळवळ उभारण्याचे काम जोमाने सुरूआहे. महाराष्ट्रात ६ हजार गावात ७० हजार कामे जलयुक्त शिवार योजनेतून सुरू आहेत.