खरिपातील भुईमूग लागवड किफायतशीर
By Admin | Updated: June 14, 2016 00:12 IST2016-06-13T23:47:19+5:302016-06-14T00:12:53+5:30
नगदी पीक : महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, तमिळनाडूसह कर्नाटक राज्यांत लागवड

खरिपातील भुईमूग लागवड किफायतशीर
जमिनीचा पोत आणि मानवाचे आरोग्य सुधारणारे भुईमूग हे पीक शेतीकार्याला निश्चित आर्थिक लाभ मिळवून देणारे हुकमी पीक आहे. देशातील महाराष्ट्र, आंध्र, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक या राज्यांत खरीप हंगामात लागवड केली जाते. भारतात जवळपास नव्वद लाख हेक्टर क्षेत्रांवर, तर त्यापैकी महाराष्ट्रात चार लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी केली जाते. पावसाच्या लहरीपणामुळे महाराष्ट्रात दिवसेंदिवस या क्षेत्रात घट होत आहे.
या पिकाची लागवड चांगला निचरा होणारी, सेंद्रिय खतमिश्रित जमिनीवर करावी. जमिनीला नांगरणीच्या चार पाळ्या द्याव्यात. एकरी किमान चार ते पाच ट्रॉली शेणखत द्यावे. त्यात कार्बारील १0 टक्के पंधरा किलो द्यावे. जून ते जुलै महिन्यांत या पिकाची टोकण पद्धतीने सुधारित वाणाची लागवड करावी. पेरणीपूर्व हेक्टरी वीस किलो युरिया, चाळीस किलो स्फुरद किंवा अडीचशे किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यावे. पावसाळ्यात हेक्टरी अडीचशे किलो जिप्सम द्यावे. तरीही जमिनीच्या प्रतीनुसार रासायनिक खतांची मात्रा दिल्यास उत्पादनात अधिक वाढ होईल.
भुईमुगाच्या सुधारित आणि संशोधित पंचेचाळीस जाती आहेत. यातील योग्य जातीची निवड करावी. चांगले उत्पन्न मिळण्यासाठी बीजप्रक्रिया करणे गरजेचे आहे. यामुळे सुमारे वीस टक्के उत्पादन वाढले जाते. बीजप्रक्रिया करताना रायझोबियम जीवाणूंचा वापर करावा. रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बुरशीनाशक चोळावे. पसरी जातीची लागवड केल्यास उपटी जातीपेक्षा अधिक उत्पादन मिळू शकते. तीन ते चार सरी आड एक सरी नांगरीचे खोलगट तास दिल्यास उत्पादनात निश्चितपणे वाढ होते.
स्वतंत्रपणे भुईमूग लागवड केल्यास उत्तम, मात्र तसे शक्य नसल्यास मिरची, ऊस, सोयाबीन पिकात भुईमुगाचे आंतरपीक म्हणून लागवड करावी. जमिनीच्या प्रतीनुसार दोन ओळीत ३० किंवा ४५ सेमी अंतर आणि दोन आळ्यांमध्ये १० किंवा १५ सेमी अंतर ठेवावे. पक्वतेसाठी पाने पिवळी पडू लागल्यावर काही शेंगा काढून फोडून पाहाव्यात. टरफल आतील बाजूने काळे पडू लागले की पीक पूर्ण पक्व झाले असे समजावे. काही झाडे उपटून ७५ टक्के शेंगा पक्व झाल्यावर पिकाची काढणी करावी. एकरी सात ते नऊ क्विंटल उत्पादन मिळते.
माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन भुदरगडचे तालुका कृषी अधिकारी ए. डी. भिंगारदिवे यांनी केले आहे.
जिप्सममुळे उत्पादनात भर
जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट. हे एक चांगल्या प्रकारचे भूसुधारक आहे. चोपण जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगला उपयोगी पडतो. जिप्सम वर्षातून एकदा २०० ते ३०० किलो/एकरी जमिनीत टाकावा त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. चोपण जमीन सुधारित जमिनीत रूपांतरित होते; पण शेतकरी त्याचा वापर आपल्या शेतात अत्यल्प प्रमाणात करतात. भुईमुगाचे उत्पादन वाढविण्यात हे विशेष मदत करते.
शिवाजी सावंत, गारगोटी