द्राक्षबागांत पावसाची बेरंगपंचमी

By Admin | Updated: March 11, 2015 00:05 IST2015-03-10T23:39:20+5:302015-03-11T00:05:41+5:30

सांगली जिल्ह्यातील स्थिती : निर्यातक्षम द्राक्षबागांना सर्वाधिक फटका; पंधरा हजार टन बेदाणा भिजला

Gray rainy season | द्राक्षबागांत पावसाची बेरंगपंचमी

द्राक्षबागांत पावसाची बेरंगपंचमी

सांगली : द्राक्षबागायतदारांचे दि. १, २ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसानेच दीडशे ते दोनशे कोटी रूपयांचे नुकसान झाले होते. यातून शेतकरी सावरतोय तोपर्यंत पुन्हा दि. ९ मार्चपासून मेघगर्जना, वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाच्या तडाख्यात चाळीस हजार एकरातील द्राक्षबागा सापडल्या असून त्यांचे कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच पंधरा हजार टन बेदाणा भिजल्यामुळे त्याचे वीस ते पंचवीस कोटीपर्यंत नुकसान झाले आहे. यंदा द्राक्षबागांमध्ये पावसाने बेरंगपंचमी खेळल्याने उत्पादक चिंताग्रस्त बनले आहेत. या हंगामामध्ये अवकाळी पाऊस आणि ढगाळ हवामानाने द्राक्षबागायतदारांची पाठ सोडलेली नाही. द्राक्ष छाटणी झाल्यानंतर बागा फुलोऱ्यामध्ये असताना ढगाळ हवामान आणि पावसात बागा सापडल्यामुळे बुरशी रोगापासून बचाव करण्यासाठी लाखो रूपयांची औषधे शेतकऱ्यांनी फवारली. यातून बागांमध्ये उत्तम द्राक्षे तयार झाली. दि. १ मार्चपासून द्राक्षांची निर्यात सुरु होऊन, उर्वरित बागांमधील द्राक्षांचा बेदाणा तयार होणार होता. तोपर्यंतच अवकाळी पावसाने झोडपून काढण्यास सुरुवात केल्यामुळे द्राक्षबागायतदारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या पिकांचे शेतातच नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दि. १, २ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पावसात कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार द्राक्षे, भाजीपाल्यासह २६ हजार हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे महसूल आणि कृषी विभागाकडून पंचनामे सुरु आहेत. शेतकऱ्यांचे जवळपास दीडशे ते दोनशे कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीतून शेतकरी सावरतोय तोपर्यंत पुन्हा दि. ९ व १० मार्च रोजी द्राक्षे उत्पादित होत असलेल्या खानापूर, तासगाव, मिरज पूर्व, पलूस तालुक्यांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला. यामध्ये याआधीच्या पावसातून बचावलेल्या निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाले आहे. निर्यात तर दूरच, पण ही द्राक्षे किरकोळ बाजारातही विक्री करण्यायोग्य राहिली नाहीत. द्राक्षमण्यांना मोठ्याप्रमाणात तडे गेल्यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रूपयांच्या नुकसानीचा सामना करावा लागणार आहे.
काही द्राक्षबागायतदारांनी शेडमध्ये बेदाणा करण्यासाठी टाकला आहे. तो बेदाणा जवळपास तीस हजार टन असून त्यापैकी पंधरा हजार टन बेदाणा भिजल्याचे द्राक्षबागायतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र घुळी यांनी सांगितले.
ते म्हणाले की, बेदाणा काळा पडल्यामुळे त्याची निम्म्या दरानेही विक्री होत नाही. यामुळे प्रति किलो बेदाण्याचे शंभर रूपयांप्रमाणे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांचे किमान वीस ते पंचवीस कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक मदत करण्याची गरज आहे. परंतु, बेदाणा शेतकऱ्यांचा असतो, हे प्रशासन मान्यच करायला तयार नाही. त्यामुळे सर्वाधिक बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊनही त्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे. विमा कंपन्यांकडूनही ठोस मदत मिळत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)


बेदाणा उत्पादकांची धांदल!
प्रवीण जगताप ल्ल लिंगनूर
मागील आठवड्यात एक दिवस आणि काल (सोमवारी) सायंकाळी व रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे मिरज पूर्व भागातील बेदाणा उत्पादक चिंताक्रांत आहे. काल रात्री उशिराने चाबूकस्वारवाडीच्या काही भागात सुमारे दहा मिनिटे गारपीटही झाली आहे. काळजीपोटी अनेकांनी बेदाण्याच्या द्राक्षांची दोन दिवसांपासून लगबगीने काढणी सुरू केली आहे. ही द्राक्षे रॅकवर पाठविण्यासाठी धांदल उडाली आहे.
मिरज पूर्व भागात सुभाषनगर, मालगाव, खंडेराजुरी, संतोषवाडी, बेळंकी, खटाव, सलगरे, चाबुकस्वारवाडीसह परिसरात अद्याप बेदाणा निर्मितीसाठी उत्पादित करण्यात येणारी द्राक्षे बागेत आहेत. परंतु काल पुन्हा अवकाळी पावसाने तोंड वर काढले, तसेच सोनी, भोसेसह चाबुकस्वारवाडी, खटाव परिसरात पावसाने चांगलीच हजेरी लावली. रात्री उशिराने चाबुकस्वारवाडीच्या काही भागात मध्यम आकाराच्या गाराही पडल्याने भागातील बेदाणा उत्पादकांची तारांबळ उडाली आहे. गारपिटीने द्राक्षमणी तडकणे, घडांची गळ होणे, तर पावसाने द्राक्षमणी तडकणे, कूज अशा प्रकारांनी नुकसान सुरू झाले आहे. ज्या भागातील द्राक्षे अद्याप पाऊस व गारांपासून सुदैवाने बचावली आहेत, तेथील शेतकऱ्यांनी मात्र द्राक्ष काढणीचा दोन दिवसांपासून सपाटा लावला आहे. सकाळी आठपासून सायंकाळी सातपर्यंत द्राक्ष काढणी करून नजीकच्या बेदाणा निर्मितीच्या रॅकवर द्राक्षे पाठविली जात आहेत. ज्या उत्पादकांची स्वत:ची बेदाणा निर्मितीची रॅक्स नाहीत, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. भाड्याने जवळचे शेड मिळविण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू झाली आहे.
मिरज पूर्व भागात वेगाने जादा कामगार लावून काढणी सुरू आहे. पाऊस व गारपिटीपासून वाचलेली द्राक्षे रॅकवर ठेवल्यानंतर बेदाणे तयार होण्याच्या १२ दिवसांच्या कालावधित पुन्हा त्यांचे अवकाळीपासून संरक्षण करावे लागणार आहे. त्यानंतर तयार होणाऱ्या बेदाण्याचा दर्जा आणि व्यापाऱ्यांच्या धोरणातून त्या बेदाण्याचे होणारे मूल्य, या अडचणी अद्याप लांबच आहेत. यंदा अवकाळीच्या अवकृपेमुळे व घसरलेल्या दरामुळे उत्पादक घायकुतीला आला आहे.


तीन दिवस चिंतेचेच
भारतीय हवामान खात्याच्या पुणे विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, दि. ११, १२ मार्च रोजी मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. तसेच १३, १४, १५ मार्च रोजी ढगाळ हवामान राहणार असून हलका पाऊसही पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. म्हणजे हा आठवडा शेतकऱ्यांसाठी पूर्ण चिंतेचा दिसत आहे. यामुळे शेतकऱ्यांनी मळणी करताना दक्षता घेण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.


युरोपियन राष्ट्रांत द्राक्षांची मागणी वाढली
युरोपियन राष्ट्रांमध्ये सांगली, नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक द्राक्षांची निर्यात होत असते. परंतु, यावर्षी द्राक्षे निर्यात करण्याच्यावेळीच द्राक्षबागा अवकाळी पावसाच्या तडाख्यात सापडल्या आहेत. त्यामुळे निर्यातक्षम द्राक्षांचे मोठे नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्यांनी द्राक्षे खरेदी बंद केली आहे. येथून द्राक्षांची निर्यात थांबल्यामुळे युरोपियन राष्ट्रांत प्रति किलो द्राक्षाला शंभर रूपयांपर्यंत दर मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. द्राक्षाची मागणी असूनही ती पाठवू शकत नसल्याचेही व्यापाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Gray rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.