भाजीपाल्याबाबत सरकारकडून ठोस धोरणाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:14 IST2021-03-30T04:14:54+5:302021-03-30T04:14:54+5:30

जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भीतीने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे ...

The government needs a concrete policy on vegetables | भाजीपाल्याबाबत सरकारकडून ठोस धोरणाची गरज

भाजीपाल्याबाबत सरकारकडून ठोस धोरणाची गरज

जयसिंगपूर : लॉकडाऊन कडक होण्याच्या भीतीने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत आला आहे. लॉकडाऊनच्या नावाखाली भाजीपाल्याचे दर पाडले जात आहेत. कोरोना महामारीमुळे शेती पिकवायची की नाही, असा सवाल गतवर्षी शेतकऱ्यांतून उपस्थित झाला होता. पुन्हा एकदा लॉकडाऊनचे नियम कडक केले जात आहेत. नाशवंत असणाऱ्या भाजीपाल्यासाठी सरकारकडून कोणतेही ठोस धोरण नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

गतवर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरुवातीला आठवडा बाजार बंद करण्यात आले. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेबरोबरच मुंबईसाठी पाठविला जाणारा भाजीपाला शेतातच पडून राहिल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला होता. लॉकडाऊननंतर अतिवृष्टीमुळेदेखील शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले होते. शासनाने भाजीपाला उत्पादकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणीदेखील झाली होती. सध्या लॉकडाऊनचे नियम आणखीन कडक होत असतानाच, याचा गैरफायदा घेत एजंटांकडून भाजीपाला व फूल उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे काम सुरू झाले आहे. कोबीला अक्षरश: मातीमोल दर आला आहे.

लॉकडाऊन करताना या शेतीमालाचे करायचे काय, हे सुध्दा सरकारने विचारात घेतले पाहिजे. गेली वर्षभर भाजीपाला व फळ उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था खूप वाईट झाली आहे. गेल्यावर्षी अचानक लॉकडाऊनमुळे काहीच करता आले नाही. त्यामुळे नाशवंत असणाऱ्या शेतीमालाबाबत ठोस धोरण राबविण्याची गरज आहे.

चौकट -

दर नसल्याने कोबी शेतातच

नांदणी (ता. शिरोळ) येथील बाबासाहेब कुगे या शेतकऱ्याने वीस गुंठ्यांतील कोबी पिकाला दरच नसल्याने शेतातच तोडून टाकला. लॉकडाऊन होणार, या चर्चेमुळे सर्वत्र भाजीपाला व फळांचे दर कोसळले आहेत. याउलट ग्राहकांना चढ्या भावातच भाजीपाला खरेदी करावा लागत आहे. एका बाजूला डिझेल-पेट्रोल दरवाढ, रासायनिक खतांची दरवाढ, वीज बिलांसाठी कनेक्शन तोडले जात आहेत, अशी परिस्थिती आहे.

कोट -

विविध अडचणीतून पिकविलेला शेतीमाल शिवारातच तोडून टाकावा लागत आहे. लॉकडाऊनचा निर्णय घेताना सरकारने भाजीपाला व फूल उत्पादक शेतकऱ्यांचा विचार करावा. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल.

- सागर शंभूशेटे, नांदणी.

फोटो - २९०३२०२१-जेएवाय-०५, ०६ फोटो ओळ - नांदणी (ता. शिरोळ) येथील शेतकऱ्याने दर नसल्याने शेतातच कोबी तोडून टाकला आहे.

Web Title: The government needs a concrete policy on vegetables

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.