पानसरे हल्ला तपासात सरकार अपयशी

By Admin | Updated: February 19, 2015 23:49 IST2015-02-19T21:45:30+5:302015-02-19T23:49:31+5:30

अजित पवार : कायदा, सुव्यवस्थेबाबत सरकारला धारेवर धरणार

The government fails to investigate Pansare attack | पानसरे हल्ला तपासात सरकार अपयशी

पानसरे हल्ला तपासात सरकार अपयशी

कोल्हापूर : चार दिवस झाले तरी अ‍ॅड. गोविंद पानसरे यांच्यावर भ्याड हल्ला करणारे हल्लेखोर अथवा त्यांच्याबाबतचे ठोस धागेदोरे मिळालेले नाहीत. त्याबाबत राज्य सरकार, पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असल्याची टीका माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे केली. सरकार आता नवे राहिलेले नाही. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत येत्या अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारला धारेवर धरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.पवार यांनी अ‍ॅस्टर आधार हॉस्पिटलला भेट देऊन ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या प्रकृतीविषयी विचारपूस केली. यावेळी माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार हसन मुश्रीफ उपस्थित होते. पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, सरकार कोणाचेही असू दे; पण राज्यात कायदा व सुव्यवस्था राहिली पाहिजे. आपले विचार ठामपणे मांडणाऱ्या अ‍ॅड. पानसरे यांच्यावरील हल्ला हा महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर हल्ला आहे. नरेंद्र दाभोलकर व पानसरे यांच्यावरील हल्ल्यांत साम्य असल्याचे सध्या तरी दिसते. केंद्र आणि राज्यात जो सत्ताबदल झाला, त्यानंतर हिंदुत्ववादी या नावाखाली काही गोष्टी होत आहेत. त्याचा शोध सरकारने घेतला पाहिजे. या भ्याड हल्ल्यामागे जात्यंध शक्ती आहे का? हे पाहणे आवश्यक आहे.
नागपूर, कोल्हापूर आणि लोणावळ्यातील घटना पाहता राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. राज्यात सर्वसामान्यांना सुरक्षितता वाटली पाहिजे. त्यासाठी येत्या अधिवेशनात आम्ही सरकारला धारेवर धरणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The government fails to investigate Pansare attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.