सरकारचे दिवस भरले
By Admin | Updated: June 10, 2014 02:09 IST2014-06-10T02:05:38+5:302014-06-10T02:09:53+5:30
‘एन.डी.’ कडाडले : ‘टोल गेला खड्ड्यात’, हा शाहूंच्या अस्मितेचा लढा

सरकारचे दिवस भरले
कोल्हापूर : गेली दोन वर्षे आंदोलन सुरू असताना या प्रश्नाकडे लक्ष देण्यास मुख्यमंत्र्यांना वेळ नसेल, तर आम्हालाही चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभेच्या निवडणुकीनंतर अजूनही ही मंडळी शुद्धीवर येत नसतील, तर अशा मुजोर राज्यकर्त्यांना जनतेची ताकद दाखवा, असे आवाहन करत या निष्क्रिय सरकारचे दिवस भरले आहेत, असा इशारा ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी आज, सोमवारी टोलविरोधी महामोर्चाच्या सांगताप्रसंगी दिला. कोल्हापूरला सत्ताधाऱ्यांनी नेहमीच सापत्नीकतेची वागणूक दिली आहे. त्यामुळे हा टोलचा प्रश्न नाहीच, ‘टोल गेला खड्ड्यात’ हा राजर्षी शाहू महाराज यांच्या अस्मितेचा लढा आहे, अशी संतप्त भावनाही त्यांनी व्यक्त केली.
प्रा. पाटील म्हणाले, टोलविरोधी लढा सुरू राहणार आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील ३३ टोलनाके बंद केले, पण कोल्हापूरचा प्रश्न त्यांना सोडवता आला नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही या राज्यकर्त्यांना शहाणपण सूचत नसेल, तर या प्रवृत्तीला काय म्हणावे? जुने विसरता येत नाही आणि नवीन शिकता येत नाही, अशा प्रवृत्तीची माणसे असल्याने कोल्हापूरच्या जनभावनेची कदर होत नाही. ज्यांच्या चारचाकी गाड्या नाहीत, अशी जनता ईर्ष्येने आज रस्त्यावर उतरली आहे. गोविंद पानसरे म्हणाले, खासगीकरणाच्या विळख्यात सरकार अडकले असून, जळगावमध्ये धरणाच्या बांधकामाचेही खासगीकरण केले आहे. आ. चंद्रदीप नरके म्हणाले, राजकारण बाजूला ठेवून महामोर्चात जनता सहभागी झालेली आहे. आ. राजेश क्षीरसागर व आ. सुजित मिणचेकर यांनी टोलबाबत स्थगन प्रस्ताव मांडला, पण तो ऐकून घेतला नाही. या आमदारांना बाजू मांडू न देता निलंबित केले. विरोधी आमदारांना निलंबन करण्याचा उच्चांक आघाडी सरकारने केला आहे. आता आघाडी सरकारचे निलंबन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. ‘आयआरबी’च्या दादागिरीला पोलीस सहकार्य करत असल्याचा आरोप करत कितीही दावे दाखल करा, त्याची फिकीर करत नाही, पण हे भूत कोल्हापुरातून घालवल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे आ. नरके यांनी सांगितले. यावेळी महापौर सुनीता राऊत, उपमहापौर मोहन गोंजारे, रामभाऊ चव्हाण, निवासराव साळोखे, बाबा पार्टे, प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, भगवान काटे, अनिल मादनाईक, अॅड. विवेक घाटगे, अॅड. शिवाजीराव राणे, आदी उपस्थित
होते. (प्रतिनिधी)