गोतेवाडी योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:24 IST2021-04-22T04:24:01+5:302021-04-22T04:24:01+5:30
श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : कोते ...

गोतेवाडी योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला
श्रीकांत ऱ्हायकर
लोकमत न्यूज नेटवर्क
धामोड : कोते गावासह मानेवाडी व गोतेवाडी या गावांना २०१२-१३ च्या दरम्यान एक कोटी रुपयांची पिण्याच्या पाण्याची योजना मंजूर झाली. तेव्हा गावकऱ्यांनी पिण्याच्या बाबतीत आपण स्वयंपूर्ण झालो, असे म्हणत सुटकेचा नि:श्वास सोडला; पण ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने काम पूर्ण न झाले ने तिथेच या योजनेचा फज्जा उडाला. या तीन गावांसाठी मंजूर झालेली एक कोटी रुपयांची ही योजना काही वर्षांतच कुचकामी ठरली. इतके पैसे खर्च करूनही गावकऱ्यांना मुबलक पाणी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष आहे.
दुसरीकडे घोटभर पाणी मिळवण्यासाठी महिलांना रानोमाळ भटकंती करावी लागत असल्याने ही पाणी योजना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा बनली आहे. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे योजना नुसती नावाला, पाणी नाही गावाला म्हणण्याची गत ग्रामस्थांवर आलेली आहे.
कोते ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये कोते गावासह मानेवाडी व गोतेवाडी या गावांचा समावेश होतो. २०१२-१३ साली कोते गावासह मानेवाडी, गोतेवाडी या गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जवळपास एक कोटी रुपयांची योजना मंजूर केली गेली.
कधी नव्हे ते गावात नळ जोडले गेले व नळांना पाणीही आले; पण एक कोटी रुपये खर्च करून तयार झालेल्या या योजनेने नागरिकांचा भ्रमनिराश झाला. पाइपलाइनला वारंवार लागणारी गळती, अपुरा पाणीपुरवठा, ज्यादा लाइट बिल आकार व तुलनेत कमी पाणी मिळत असल्याने या योजनेचा पुरता बोजवारा उडाला. गेल्या आठ दिवसांपासून तर गावात भीषण पाणीटंचाई असून पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी महिलांना गावभर वणवण करावी लागत आहे.
पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी या महिलांना गेल्या आठ दिवसांपासून गावाशेजारील कूपनलिका अथवा झऱ्यांचा आश्रय घ्यावा लागत आहे; पण कूपनलिकांची पाणीपातळीही खालावल्याने गावातील एकाच कूपनलिकेवर सकाळी मोठी गर्दी पहावयास मिळते आहे. यावेळी पाणी मिळवताना महिला वर्गात जोरदार भांडणे होताना पाहावयास मिळत आहे.
प्रतिक्रिया
गेल्या आठ दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत असताना देखील ग्रामपंचायत प्रशासन याकडे गांभीर्याने का बघत नाही. गावचा पाणीप्रश्न कायमचा मिटवण्याची भाषा करणारे आता कुठे आहेत. किमान महिलांची भटकंती थांबवण्यासाठी तरी अशांनी पुढाकार घ्यावा.
- सचिन पाटील (सामाजिक कार्यकर्ते, कोते )
फोटो ओळी= गोतेवाडी (ता. राधानगरी) येथील शेती पंप व कूपनलिकेवरती पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी ग्रामस्थांची होत असलेली गर्दी.