महोत्सवांमुळे चांगला माणूस घडेल
By Admin | Updated: December 29, 2016 01:07 IST2016-12-29T01:07:10+5:302016-12-29T01:07:10+5:30
किफ्फ महोत्सव : मुक्त संवादात मान्यवरांचा सूर

महोत्सवांमुळे चांगला माणूस घडेल
कोल्हापूर : आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे रसिक व चित्रपट यांच्यामधील महत्त्वाचा धागा असतात. या माध्यमातून प्रेक्षकांच्या अभिरुची घडण्यास मदत होते. त्यामुळे अशा महोत्सवांचे प्रमाण वाढल्यास चांगला माणूस घडेल, असा सूर बुधवारी मुक्त संवादात पाहावयास मिळाला.
कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीतर्फे राजर्षी शाहू स्मारक भवन येथे आयोजित पाचव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत ‘चित्रपट महोत्सव का व कशासाठी?’ या विषयावरील मुक्त संवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये अभिनेते स्वप्निल राजशेखर, अंशुमन जोशी, प्रिया दंडगे, प्रा. राजेंद्र मेंगाणे यांनी सहभाग घेतला.
राजशेखर म्हणाले, प्रगल्भ प्रेक्षक निर्मितीसाठी चित्रपट महोत्सव उपयुक्त आहेत. ‘किफ्फ’सारखे महोत्सव चित्रपट निर्मात्यांना प्रेरित करतात. लघुपट निर्मात्यांना असे महोत्सव म्हणजे हक्काचे व्यासपीठ ठरले आहे. अशा व्यासपीठामुळेच तो लोकांपर्यंत पोहोचतो. त्यावर साधक-बाधक चर्चा होते व प्रतिक्रियाही मिळते, हे अधिक महत्त्वाचे आहे.
जोशी म्हणाले, सिनेमा पाहण्याची आवड निर्माण होण्यास महोत्सव उपयुक्त ठरतात. तसेच सिनेमा पाहताना जे प्रश्न पडतात, त्यांचा शोध घेण्यासाठी, उत्तरे शोधण्यासाठी, अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे. ‘किफ्फ’सारख्या महोत्सवांमुळे कोल्हापूरमध्ये जागतिक दर्जाचे चित्रपट पाहण्याची आवड निर्माण होत आहे, ही महत्त्वाची गोष्ट आहे.
प्रा. मेंगाणे म्हणाले, चाकोरीबाहेरील चित्रपटांचा अनुभव महोत्सवांमुळे मिळतो. दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी, तसेच चित्रपटांविषयी जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत होते. अशा महोत्सवांत रसिकसंवादाची व्याप्ती वाढायला हवी.
दंडगे म्हणाल्या, जागतिक सिनेमाच्या पटलावर भारतीय सिनेमा कुठे आहे, त्याची दृश्यभाषा, चित्रभाषा, यासाठी चित्रपट महोत्सव उपयुक्त आहेत. जगाचं भान येण्यासाठी स्वत:मध्ये माणूस म्हणून काय बदल व्हायला हवेत, यासाठी असे महोत्सव आवश्यक आहेत. त्यासह समान आवडी-निवडीच्या लोकांना भेटण्यासाठीही महोत्सव आवश्यक आहे. इतिहासात रमण्यापेक्षा काळाबरोबर अशा महोत्सवाचे योग्य मार्केटिंग करायला हवे. कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी यांनी चित्रपट महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका विशद केली. दरम्यान, मुक्त संवादात सहभागी प्रेक्षकांनी महोत्सवात ओपन फोरम, फिल्म बझार यासारख्या संकल्पना जास्तीतजास्त राबवाव्यात, अशा सूचना केल्या. तसेच लघुपटासारख्या संकल्पना ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा, असा सूर उमटला.
—————
फोटो : २८१२२०१६-कोल-किफ्फ फेस्टिवल
————-