गुड न्यूज : सोयाबीनचा दर हमीभावाच्या दुपटीकडे, प्रथमच ६ हजारांच्यावर दर : जागतिक बाजारपेठेतील टंचाईचे कारण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:24 IST2021-04-13T04:24:02+5:302021-04-13T04:24:02+5:30

(फोटो : १२०४२०२१-कोल-सोयाबीन संग्रहित छायाचित्र) विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जगाच्या बाजारात यंदा पामतेलाचे उत्पादन कमी असल्याने ...

Good news: Soybean price doubles to Rs 6,000 for the first time: Reasons for shortage in global markets | गुड न्यूज : सोयाबीनचा दर हमीभावाच्या दुपटीकडे, प्रथमच ६ हजारांच्यावर दर : जागतिक बाजारपेठेतील टंचाईचे कारण

गुड न्यूज : सोयाबीनचा दर हमीभावाच्या दुपटीकडे, प्रथमच ६ हजारांच्यावर दर : जागतिक बाजारपेठेतील टंचाईचे कारण

(फोटो : १२०४२०२१-कोल-सोयाबीन संग्रहित छायाचित्र)

विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जगाच्या बाजारात यंदा पामतेलाचे उत्पादन कमी असल्याने सोयाबीन तेलाची मागणी प्रचंड वाढली आहे. त्याचा परिणाम म्हणून सोयाबीनचा दर क्विंटलला प्रतिदिन शंभर रुपयांनी वाढत आहे. सोयाबीनचा क्विंटलचा हमीभाव ३८०० रुपये आहे आणि बाजारात सोमवारचा दर ६८२३ रुपये होता. आतापर्यंत इतिहासात सोयाबीनचा दर ४ हजारांच्या पुढे कधी गेलेला नव्हता. इतका चांगला दर मिळत असल्याने शेतकरी बियाणेही विकून टाकत असल्याचे चित्र आहे. मागील नऊ दिवसांत क्विंटलला ६२५ रुपयांची दरवाढ झाली आहे.

देशाच्या बाजारपेठेतील मध्यप्रदेश व महाराष्ट्र ही सोयाबीनची प्रमुख उत्पादक राज्ये आहेत. महाराष्ट्रातही लातूरसह नांदेड, औरंगाबाद, जालना, हिंगोली, बुलडाणा, उस्मानाबाद, अकोला, वाशिम या जिल्ह्यांत सोयाबीनचे क्षेत्र जास्त आहे. आतापर्यंत कडधान्यांना फारशी किंमत कधीच मिळत नसे. मागच्या काही महिन्यांपर्यंत ४ हजार रुपये क्विंटलवर दर गेल्यावर शेतकऱ्यांनीही चांगला दर मिळाला म्हणून सोयाबीन विकून टाकले आहे. सध्याच्या दरवाढीला जागतिक बाजारपेठेतील टंचाई कारणीभूत असली तरी त्यातून शेतकऱ्याला चांगला दर मिळत आहे. दुसऱ्या बाजूला खाद्यतेलाचे भाव मात्र गगनाला भिडले आहेत. सोमवारी शेंगतेलाचा किलोचा दर १९० रुपयांवर गेला आहे.

महाराष्ट्रात एकेकाळी भुईमूग व करडईचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावर घेतले जाई; परंतु ही दोन्ही तेलबियांची पिके आता कमी झाली आहेत व सोयाबीनचे क्षेत्र वाढले आहे. या पिकांतून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत असतील तर ते चांगलेच आहे. यापूर्वी कधीच क्विंटलचा दर ४ हजारांच्या पुढे गेलेला नाही. दर चांगला मिळतो म्हणून बियाणांचीही विक्री करू नये; अन्यथा खरिपात बियाणांचा काळाबाजार होईल.

डॉ. राजाराम देशमुख

माजी कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी

जागतिक बाजारपेठेतील सोयाबीनच्या किमती वाढल्या आहेत. चीनने मोठ्या प्रमाणावर अमेरिकेतून सोयाबीन आयात केले आहे. त्याचा परिणाम म्हणून खाद्यतेलाच्या किमती भडकल्या आहेत. भारतातून १६ लाख टन सोयापेंड निर्यात झाली आहे. त्यामुळेही देशांतर्गत साठा कमी झाला असल्याने जागतिक बाजारपेठेतील दरापेक्षा भारतातील सोयाबीनचे दर वाढले आहेत.

दीपक चव्हाण

शेती बाजारव्यवस्थेचे अभ्यासक पुणे

दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादन

क्षेत्र - २०१९-२० : ४१ लाख २४ हजार हेक्टर

२०२०-२१ : ४३ लाख ५७ हजार हेक्टर

उत्पादन- २०१९-२० : ४८ लाख टन

- २०२०-२१ : ६२ लाख टन

मागच्या आठवड्यातील सोयाबीनचे क्विंटलचे दर

३ एप्रिल : ६१९८

५ एप्रिल : ६३७७

६ एप्रिल : ६५४५

१० एप्रिल : ६७३४

१२ एप्रिल : ६८२३

Web Title: Good news: Soybean price doubles to Rs 6,000 for the first time: Reasons for shortage in global markets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.