राजगोळीच्या मातीला सोन्याचा भाव!

By Admin | Updated: September 6, 2016 01:15 IST2016-09-06T00:47:03+5:302016-09-06T01:15:18+5:30

प्रशासनाचा कानाडोळा : दररोज रात्री ५० ट्रक मातीची उचल; पाटणे फाटा येथे वाळूचा बाजार, रस्त्यांची दुर्दशा

Gold price in the table of palm! | राजगोळीच्या मातीला सोन्याचा भाव!

राजगोळीच्या मातीला सोन्याचा भाव!

नंदकुमार ढेरे -- चंदगड --तालुक्याच्या पूर्वेकडे असलेल्या राजगोळी खुर्द, चन्नेहट्टी, तिरमाळ, यर्तेनहट्टी, कामेवाडी येथील मातीची वाळू म्हणून विक्री करण्याचा धंदा सध्या या भागात जोरात सुरू असून, रोज रात्री ५० ट्रक मातीचे बेकायदेशीर उत्खनन केले जात आहे. एका रात्रीत जवळपास दहा लाख रुपयांची उलाढाल सुरू असून, शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी चुकवून हे वाळूमाफिया गब्बर होत आहेत. प्रशासनाची यंत्रणा असूनही कारवाई मात्र का होत नाही? याचे नवल जनतेला वाटत आहे.
घर बांधकाम, रस्ते काँक्रिटीकरण, साकव बांधणे, आदी कामांसाठी कर्नाटकातील रामनगर, खानापूर, गोकाक या ठिकाणाहून चंदगड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू येत होती; पण कर्नाटक सरकारने वाळू उपशावर रॉयल्टी बसविल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळूटंचाई निर्माण झाली. याला पर्याय म्हणून राजगोळी परिसरातील काही लोकांनी नदीकाठची माती काढून त्यावर पाणी मारून ही वाळू रामनगरची आहे, असे सांगून लोकांच्या गळ्यात मारत आहेत.
सुरुवातीच्या काळात लोकांना माहीत नसल्याने त्यांनी वाळू खरेदी करण्यास नकार दिला. त्यावेळी या वाळूमाफियांनी दर कमी करून विक्री करण्यास सुरुवात केली. वाळूचा तुटवडा सगळीकडेच पडत असल्याने नाईलाजास्तव लोकांनी ही वाळू खरेदी करण्यात सुरुवात केली. त्यामुळे या माफियांनी वाळूचे दर १२ हजारांवरून ३० हजारांपर्यंत वाढविले आहेत.
कशी तयार होते वाळू
राजगोळी परिसरातील माती ही पाढऱ्या वाळूकाश्म पद्धतीची आहे. या मातीमध्ये बारीक खड्यांचे प्रमाण आहे. त्यामुळे जेसीबीद्वारे सपाट अथवा टेकडीजवळील माती काढून त्याचा एकत्र मोठा ढीग रचला जातो. या मातीवर मोटारीच्या प्रेशरने पाणी मारून धुतली जाते. दिवसभर काढलेली माती धुतल्यानंतर तिची वाळू बनते. त्यानंतर रात्री चंदगड, पाटणे फाटा, कोवाड, माणगाव बरोबरच बेळगाव परिसरातील जवळपास ५० ट्रकद्वारे ही वाळू सावधगिरीने पाठविली जाते.
दड्डी, हेमरसमार्गे २० ते २५ ट्रक कर्नाटकात जातात, तर २० ते २३ ट्रक दुंडगे, कुदनूर मार्गे चंदगड तालुक्यात येतात. पाटणे फाटा येथे दररोज पहाटे चार वाजल्यापासून वाळूचा बाजार भरतो. वाळूने भरलेले ट्रक रस्त्याच्याकडेला उभे राहतात. आॅर्डरीप्रमाणे या वाळूची विक्री केली जाते. राजगोळी येथे जाग्यावर दहा हजारांपर्यंत एक ट्रक भरून मिळतो. पुढे हेच ट्रकमालक २५ हजारांपेक्षा पुढे ही वाळू विकतात. एका रात्रीत राजगोळी, तिरमाळ, यर्तेनहट्टी, कामेवाडी येथे दहा लाखांची उलाढाल होते. शासनाची लाखो रुपयांची रॉयल्टी हे वाळूमाफिया बुडवित आहेत. दररोज रात्री होणाऱ्या वाळू वाहतुकीमुळे ट्रकमधील पाणी व वाळू पडून रस्त्यावर निसरट होण्याबरोबरच मोठ-मोठे खड्डे पडून रस्ता वाहतुकीस अयोग्य बनत आहे.


तहसील कार्यालय : ठोस कारवाईची गरज
राजगोळी परिसरात अवैध माती वाळू उत्खनन होत आहे. याबाबत वृत्तपत्रांनी आवाज उठविल्यानंतर चंदगड तहसील कार्यालयातर्फे काही वाळूमाफियांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा नोंद करण्यात आला आहे.
त्यानंतर काही दिवस वाळू उपसा बंद होता; पण गेल्या १५ दिवसांत हे वाळूमाफिया पुन्हा सक्रिय झाले असून, पुन्हा राजरोस वाळूची तस्करी होत आहे.
चंदगड तहसील कार्यालयातर्फे वरवरची कारवाई न करता ठोस कारवाई केली, तरच बेकायदेशीर उत्खनन थांबणार आहे.
अन्यथा ‘चिरिमिरी’च्या आशेने केवळ कारवाईचा दिखाऊपणा केल्यास हे वाळूमाफिया
शिरजोर झाल्याशिवाय राहणार नाहीत.

Web Title: Gold price in the table of palm!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.