बाजार समिती सभेत ‘गोकुळ’चे पडसाद
By Admin | Updated: September 23, 2016 00:35 IST2016-09-23T00:25:44+5:302016-09-23T00:35:51+5:30
शाहू उद्यान दुरवस्थाबाबत चर्चा : संचालकांना कोंडीत पकडण्याचा सुनील कदम यांचा प्रयत्न

बाजार समिती सभेत ‘गोकुळ’चे पडसाद
कोल्हापूर : शाहू उद्यानाची दुरवस्था, बंद केलेली प्रवेशद्वारे व ‘पणन’ची मान्यता न घेता पेट्रोल पंपाच्या जागेची विक्री केलीच कशी, आदी मुद्द्यांवर माजी महापौर सुनील कदम यांनी संचालक मंडळाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कदम यांनी अर्धा तास हे विषय ताणून धरले, पण उपसभापती विलास साठे व उपसचिव मोहन सालपे यांनी त्याच ताकदीने प्रत्युत्तर केले. कदम पहिल्यांदाच सभेला उपस्थित राहिले. त्याचबरोबर त्यांचे टार्गेट पाहता ‘गोकुळ’ सभेचे पडसाद बाजार समिती सभेत उमटल्याची चर्चा सभास्थळी होती.
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये झाली. अध्यक्षस्थानी सभापती सर्जेराव पाटील-गवशीकर होते. समितीचे ‘दक्षिण’ व ‘उत्तर’कडे बंद केलेल्या प्रवेशद्वाराच्या विषयाला हात घालत, मुख्य रस्त्याकडील प्रवेश बंद केल्याने बँकांसह विविध कामांसाठी समितीत येणाऱ्या नागरिकांची कुचंबणा होत आहे, कोणाच्या परवानगीने बदल केला. शाहू उद्यानाच्या दुरवस्थेबाबत सुनील कदम यांनी विचारणा केली. त्यावर मुख्य रस्त्याकडील प्रवेशद्वारांमुळे अपघात होत असल्याने हा निर्णय घेतला असून सकाळी दहा ते सायंकाळी सहापर्यंत हे गेट सुरू करणार आहे.
शाहू उद्यानासाठी सोळा लाखांची तरतूद केली असून पावसाळ्यानंतर तातडीने काम सुरू केले जाणार असल्याचे उपसभापती विलास साठे यांनी सांगितले. समिती आवारातील हिरो होंडाचे शोरूम आत आलेच कसे? असा प्रश्न करत उत्पन्नवाढीसाठी प्लॉट द्या पण तिथे बेकायदेशीर काही होऊ नये, अशी मागणी कदम यांनी केली. ‘पणन’ची मान्यता न घेताच पेट्रोल पंपाची जागा विक्री केलीच कशी? त्यावेळी सभापती कोण होते, अशी विचारणा कदम यांनी केली. त्यावर तत्कालीन कालावधीतील कामकाजाची चौकशी होऊन जिल्हा उपनिबंधक योग्य ती कारवाई करत असल्याचे साठे यांनी सांगितले.
नवीन पंप सुरू करण्याचा प्रस्ताव समितीचा असल्याचेही त्यांनी सांगितले. गूळ बॉक्स परत द्यावेत, ‘जी. आय.’ मानांकनाचा अवलंब करावा, अशी मागणी उत्तम पाटील यांनी केली. राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणाने व्यापारी बाहेर निघाले असून नियमनमुक्तीबाबत फेरविचार करावा, अन्यथा समितीची अवस्था वाईट होईल, असा इशारा प्रसाद वळंजू यांनी दिला. महादेव शिंदे, सीताराम गोरे यांनी प्रश्न उपस्थित केले. सभापती सर्जेराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. सभेला संचालक, सचिव विजय नायकल, उपसचिव दिलीप राऊत, मोहन सालपे, अधिकारी, शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.
कदमांच्या चिमट्याने काटे अस्वस्थ
भगवान काटे इकडे बसले असते तर बोलले असते, आता बोलणार नसल्याचा चिमटा सुनील कदम यांनी सुरुवातीलाच काढला. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या काटे यांनी खुलासा करत, संचालक मंडळावर अंकुश ठेवल्यानेच चांगला कारभार सुरू असल्याचे सांगितले, तर नुसता चांगला नव्हे सगळेच बंद असल्याचे प्रशस्तिपत्रक नंदकुमार वळंजू यांनी दिले.
आमचा सदस्य कुठे आहे?
महापालिका व समिती एकमेकांशी संलग्न असल्याचे सांगत येथे आमचाही सदस्य असतो, पण तो गेला कुठे? सालपेसाहेबांनी आमचा सदस्य घालविल्याचा आरोप करत कदम यांनी सभेला उपस्थित राहण्यामागील दिशा स्पष्ट केली.
संचालकांच्या अभिनंदनाचा ठराव
रस्त्यासह विविध सुविधा व कांद्याला प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान दिल्याबद्दल संचालक मंडळाचा तर नियमनमुक्तीबद्दल राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
रस्ते ताब्यात देण्यास नकार
रस्त्यांचा विकास करण्यासाठी महापालिकेच्या ताब्यात अंतर्गत रस्ते देण्याची मागणी कदम यांनी केली. त्याला उपसभापती साठे यांनी नकार दिला.