‘गोकुळ’ची सभा गुंडाळली
By Admin | Updated: September 8, 2016 01:04 IST2016-09-08T01:00:16+5:302016-09-08T01:04:21+5:30
प्रचंड गोंधळ, खडाजंगी : सुनील कदम यांच्या दिशेने कागदाचे बोळे भिरकावले; विरोधकांची समांतर सभा

‘गोकुळ’ची सभा गुंडाळली
कोल्हापूर : सभास्थळी सुरुवातीपासून असलेला तणाव, लेखी प्रश्न विहित वेळेत का दिले नाहीत, म्हणून उत्तर देण्यास सत्ताधाऱ्यांनी दिलेल्या नकारामुळे आक्रमक झालेले विरोधक, त्यातून निर्माण झालेला गोंधळ अशा वातावरणातच कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाची (गोकुळ) सभा बुधवारी चर्चेविनाच गुंडाळली. सतेज पाटील व सुनील कदम यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू असताना कदम यांच्या दिशेने कागदाचे बोळे भिरकावल्याने गोंधळात अधिकच भर पडली. संघाच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या तणावपूर्ण वातावरणात व गोंधळातच सभा झाली. सभेनंतर विरोधकांनी समांतर सभा घेतली.
‘गोकुळ’ची ५४वी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या ताराबाई पार्कातील सभागृहात झाली. अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील होते. दुपारी एक वाजता सभा सुरू झाली. गोंधळानंतर पावणेतीनच्या सुमारास ती संपली. सचिव सदाशिव पाटील मागील सभेचे प्रोसिडिंग वाचत असताना बाबासाहेब देवकर यांनी त्यांना रोखले. प्रोसिडिंग सविस्तर वाचा, अशी मागणी करीत चॉपकटर विषयाला हात घातला. त्यावर ‘मंजूर, मंजूर’ म्हणत गोंधळ सुरू झाल्यानंतर ‘आबाजी, हे बरोबर नाही. तुमचा कारभार स्वच्छ आहे तर हिमतीने उत्तर द्या. गडबड का करता?’ अशी विचारणा आमदार सतेज पाटील यांनी केली. ‘आम्ही पळवाट काढत नाही. आमच्या कारभाराविषयी तुम्ही सांगू नका. १६० कोटी शिल्लक आहेत,’ असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितल्यावर सभेचे वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. परजिल्ह्यात बल्क कुलर बसविल्याने संघाला २४ कोटींचा तोटा झाला. यासाठी आपण परवानगी घेतली नसल्याचेही लेखापरीक्षण अहवालात म्हटल्याचे किरण पाटील यांनी सांगितले. यावर बल्क कुलर ही गरज आहे; यामुळे तोटा झालेला नाही. आपल्यासमोर ‘अमूल’चे मोठे आव्हान असल्याचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी सांगितले. त्यांना रोखत ‘तोटा नाही तर लेखापरीक्षण अहवाल खोटा आहे काय? व्यासपीठावर लेखापरीक्षक फडणवीस बसले आहेत. त्यांना विचारा, तोटा झाला असेल तर कबूल करा आणि सुधारणा करतो म्हणा,’ असे सतेज पाटील यांनी सांगितले. ‘येथे कोणी भाषण करायचे नाही, आम्हालाही बोलू द्या,’ असे सांगत नगरसेवक सुनील कदम यांनी पाटील यांना रोखले. संतप्त पाटील यांनी ‘अध्यक्षसाहेब, आम्हाला सभा चालवायची आहे, तुम्ही उत्तरे द्या,’ असे सांगितले. तोपर्यंत उपस्थितांमधून ‘मंजूर मंजूर’च्या घोषणा सुरू झाल्यानंतर पाटील यांनी शांत बसण्याचे आवाहन केले. सभेचा नूर पाहून ज्येष्ठ संचालक अरुण नरके यांनी मार्गदर्शन केल्यानंतर पुन्हा सतेज पाटील उठले. ‘अमूल’चे संकट आम्हालाही मान्य आहे; पण त्यासाठी तुम्ही काटकसर करणार की नाही? वासाचे दूध परत करा. आम्ही ते ओतून टाकतो. अन्न आणि औषध प्रशासनाची भीती आम्हाला सांगू नका, असे सुनावत शपथपूर्वक सांगतो, ‘गोकुळ’ वाचला पाहिजे हीच आमची प्रामाणिक भूमिका आहे. स्पर्धेत उतरायचे म्हटले तर चार पैसे जादा दर दिला पाहिजे. ‘अमूल’ला घाबरू नका. ‘गोकुळ’च्या हितासाठी संचालकांच्या पुढे रस्त्यावर उतरू; पण तुम्ही कारभार तेवढा सुधारा, असे पाटील यांनी सांगितले. ‘प्रश्न पोस्टाने पाठविले आहेत. तुम्हाला मिळाले नसले तरी उत्तरे द्या,’ असा आग्रह पाटील यांनी धरला. यावर ‘नोंद घेतो’ असे उत्तर देत अध्यक्ष पाटील यांनी अहवाल मंजूर का? असे विचारले, गोंधळातच ‘मंजूर, मंजूर’ असे सांगण्यात आले. त्यानंतर विरोधी गटाकडून ‘बचाओ बचाओ, गोकुळ बचाओ’च्या घोषणा सुरू झाल्या. त्यात पुन्हा सुनील कदम बोलण्यास उठले. संस्था बुडविणाऱ्यांनी बोलू नये, असे कदम म्हटल्यानंतर त्यावर हरकत घेत, ‘आपण कोणाचे नाव घेतलेले नाही. नरकेसाहेब, तुम्हाला हे मान्य आहे का?’ असे आमदार पाटील म्हणत असताना कदम व पाटील यांच्यात जुंपली. त्यानंतर ‘मंजूर मंजूर’ घोषणा सुरू असतानाच ज्येष्ठ संचालक रवींद्र आपटे यांनी आभार मानले. सभेला आमदार सत्यजित पाटील यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
विरोधकांचा गोंधळ पूर्वनियोजित : विश्वास पाटील
मागील प्रोसिडिंग वाचन सुरू असताना इतर प्रश्न विचारून सभेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला. तरीही आम्ही समर्पक उत्तरे देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांना गोंधळ घालून समांतर सभा घेण्याचे पूर्वनियोजन होते. त्यांनी अगोदरच पोलिस यंत्रणेकडे तशी परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वीच अंडर पोस्टिंग सेवा बंद केल्याने सतेज पाटील यांनी कोणत्या सेवेच्या माध्यमातून प्रश्न पाठविले हे कळत नाही. त्यांच्या कार्यालयापासून ‘गोकुळ’ हाकेच्या अंतरावर असताना प्रश्न पोस्टाने द्यायची गरज का भासली? असा सवाल अध्यक्ष विश्वास पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. परजिल्ह्यातील दुधावर खर्च झाल्याचे विरोधक सांगतात; पण ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सूचनेनुसारच सीमाभागातील बांधवांना आधार देण्यासाठी तेथील दूध खरेदी करीत आहोत; पण त्याकडे केवळ राजकारण म्हणून बघणाऱ्यांना हे कळणार नसल्याचा टोलाही पाटील यांनी लगावला.
अशी गुंडाळली सभा ‘गोकुळ’ची सभा ठरल्याप्रमाणे दुपारी एक वाजता सुरू झाली. श्रद्धांजली, गोकुळ श्री, गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार यात बराच वेळ गेला. त्यानंतर अध्यक्ष विश्वास पाटील यांचे भाषण, नोटीस वाचन याप्रमाणे सभेचे कामकाज रीतसर तासभरापेक्षा अधिक काळ चालले. त्यानंतर मागच्या सभेचे प्रोसिडिंग कायम करण्यासाठीच्या विषयावरून गोंधळाला सुरुवात झाली. बाबासाहेब देवकर यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. दरम्यान, अरुण नरके यांच्या भाषणानंतर सतेज पाटील प्रश्न विचारण्यासाठी उभे राहिले. त्यांना विरोध म्हणून गोंधळ सुरू झाला व त्यातच सभा गुंडाळण्यात आली. +++
परिसरात घोषणा
संचालक मंडळ व्यासपीठावर आल्यानंतर समर्थकांनी महादेवराव महाडिक यांच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यानंतर विरोधी गटातील कार्यकर्त्यांनीही सतेज पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याने परिसर दणाणून गेला.
संचालकांना भीती..
राष्ट्रगीत झाल्यानंतर विरोधक तिथेच समांतर सभा घेतील, असे वाटत असल्याने संचालकांनी व्यासपीठ सोडलेच नाही. विरोधक सभागृहाबाहेर गेल्यानंतरच ते व्यासपीठावरून खाली आले.