उत्पादन कंपनीच्या माध्यमातून गूळ आता युरोपला जाणार
By Admin | Updated: January 24, 2015 00:08 IST2015-01-23T23:58:49+5:302015-01-24T00:08:58+5:30
गूळ उत्पादकांचा निर्णय : ‘जी.आय.’च्या कार्यशाळेस प्रतिसाद

उत्पादन कंपनीच्या माध्यमातून गूळ आता युरोपला जाणार
कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला गुळासाठी मिळालेल्या ‘जी.आय.’चा वापर प्रभावीपणे करण्यासाठी गूळ उत्पादन कंपनी स्थापना करून गूळ युरोपला निर्यात करण्याचा निर्णय गूळ उत्पादकांनी घेतला. ‘जी.आय.’ची अंमलबजावणीबाबत आज, शुक्रवारी समितीच्या मल्टिपर्पज हॉलमध्ये गूळ उत्पादकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यांदा गुऱ्हाळमालकांचे ‘जी.आय.’ रजिस्ट्रेशन करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
प्रा. गणेश हिंंगमिरी यांनी ‘जी.आय.’बाबत माहिती देण्यास सुरुवात केली पण त्यांना रोखत दीड वर्षांपूर्वी समितीला ‘जी.आय.’ मिळाला, पण त्याची अंमलबजावणी कधी होणार, असा सवाल गूळ उत्पादकांनी केला. त्याचा वापर कसा करायचा, त्याचा फायदा कसा होणार याची माहिती द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. यावर बोलताना प्रा. हिंगमिरी म्हणाले, परदेशात गूळ पाठविण्यासाठी ‘जी.आय.’ गरजेचा आहेच पण त्याबरोबर व्हिसा आवश्यक असतो. यासाठी प्रत्येक गूळ उत्पादकाच्या नावावर ‘मान्यताप्राप्त कर्ता’ अशी नोंदणी होणे गरजेचे आहे. या नोंदणीतून केवळ गूळच नव्हे तर गुळापासून तयार होणारे उपपदार्थही निर्यात करता येतात.
केवळ शेतकऱ्यांचे रजिस्ट्रेशन करून चालणार नाही, गूळ उत्पादक कंपनीची स्थापना करून त्याच्या माध्यमातून गूळ निर्यात करूया, अशी मागणी करत अरुण देसाई (तेरणी) म्हणाले, एका दिवसात कोणताही पदार्थ निर्यात होत नाही, त्यासाठी मोठी प्रक्रिया असते. आपण आळसी आहोत, किती दिवस बाजार समितीवरच अवलंबून राहायचे, मानसिकता बदलून पुढे जाणे गरजेचे आहे. त्याला सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. शामराव कुंभार (वारनूळ), भगवान काटे, हिंदुराव तोडकर (वाकरे) यांनी विविध प्रश्न उपस्थित केले. समितीचे साहाय्यक सचिव मोहन सालपे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उपसचिव विजय नायकल यांनी आभार मानले. गूळ उत्पादक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी पाटील, आदम मुजावर, अॅड. अजित पाटील आदी उपस्थित होते.
दोनच गुऱ्हाळघरे मानांकनास पात्र!
‘जी.आय.’ मानांकन वापराबाबत समितीने ४३ गुऱ्हाळघरांचा सर्व्हे केला. यामध्ये केवळ दोनच गुऱ्हाळघरांवर गूळ हे मानांकन वापरण्यास पात्र होते, अशी माहिती समितीचे सचिव संपतराव पाटील यांनी दिली.
शेतकऱ्यांची उदासीनता !
गूळ व्यवसाय परवडत नाही, चांगला दर मिळाला पाहिजे, अशी घरात बसून ओरड करणारे गूळ उत्पादक असल्याने संघटितपणे गूळदराचा प्रश्न मार्गी लागला नाही. ‘जी.आय.’बाबत महत्त्वाची कार्यशाळेला शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, यासाठी समितीने सुमारे तीन हजार हँडबिलांचे वाटप केले होते, पण कार्यशाळेला केवळ पंधरा शेतकरी उपस्थित होते.