घटप्रभा उपखोऱ्यास पाच टीएमसी वाढीव पाणी द्या!

By Admin | Updated: July 25, 2015 01:14 IST2015-07-24T00:07:32+5:302015-07-25T01:14:36+5:30

संध्यादेवी कुपेकर : गडहिंग्लज येथील जल आराखडा कार्यशाळेत मागणी

Give water to TMC five times to Ghatprabha Subdivision! | घटप्रभा उपखोऱ्यास पाच टीएमसी वाढीव पाणी द्या!

घटप्रभा उपखोऱ्यास पाच टीएमसी वाढीव पाणी द्या!

गडहिंग्लज : गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यांतील जनतेच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी कृष्णा पाणी वाटप लवादातील सुधारित पाणी वाटपातील कोट्यातून घटप्रभा उपखोऱ्याला आणखी पाच टीएमसी वाढीव पाणी मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार संध्यादेवी कुपेकरांनी गुरुवारी केली.महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळातर्फे आयोजित घटप्रभा उपखोरे एकात्मिक राज्य जल आराखडा कार्यशाळेत त्या बोलत होत्या. सभापती अनुसया सुतार, नगराध्यक्ष राजेश बोरगावे यांची प्रमुख उपस्थिती होती. येथील नगरपालिकेच्या शाहू सभागृहात ही कार्यशाळा झाली.कुपेकर म्हणाल्या, गडहिंग्लज विभागातील उचंगी, आंबेओहळ व सर्फनाला हे रेंगाळलेले प्रकल्पही तातडीने पूर्ण करावेत. चित्री प्रकल्पाची उंची वाढवून पाणी साठवण क्षमता वाढवावी.श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई म्हणाले, कृषीसह सर्व संबंधित खात्यांना बोलवून जल आराखड्यासाठी पुन्हा बैठक घ्यावी. साठवलेले पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी स्पष्ट धोरण व योग्य नियोजन हवे. प्रारूप आराखड्याचा मसुदा प्रत्येक गावचावडीवर प्रसिद्ध करून जनतेची मते घ्यावीत.
डॉ. नंदिनी बाभूळकर म्हणाल्या, गडहिंग्लज विभागाला अधिकाधिक पाणी मिळविण्याचे आव्हान सर्वांसमोर आहे. त्यासाठी मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र यावे. शेती व पिण्याच्या पाण्याबरोबरच पर्यटनक्षेत्र विकासातून स्थानिक रोजगार निर्मिती करायला हवी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य सचिव राजेंद्र गड्यान्नावर म्हणाले, दरवर्षी घटप्रभा खोऱ्यातून २५० टीएमसी पाणी वाहून जाते. त्याच्या वापराच्या नियोजनाबरोबरच वाढीव पाण्याच्या मागणीसाठी केंद्रीय जल आयोगाकडे पाठपुरावा करायला हवा. प्रकल्पांसाठी जमिनी देणाऱ्या शेतकऱ्यांना तेथील वीजनिर्मिती उद्योगात सामावून घ्यावे.
शेतीतज्ज्ञ अरुण देसाई म्हणाले, भौगोलिक क्षेत्रफळ व लोकसंख्या विचारात घेऊन पाण्याची मागणी करावी. जे पाणी अडवलेले नाही व वापरायला मिळत नाही, ते हिशेबात धरू नये.
प्राचार्य अर्जुन आबीटकर म्हणाले, जल आराखड्यासाठी कृषी, जलसंधारण, भूजल विकास व जि. प. यांनी समन्वयाने काम करावे.
जि. प. सदस्या शैलजा पाटील, शिवसेनेचे प्रा. सुनील शिंत्रे, किसान संघाचे मदन देशपांडे व राम पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. साताऱ्याचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांनी स्वागत केले. कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता सुनील साळुंखे यांनी प्रारूप आराखड्याची माहिती दिली.
यावेळी जि. प. सदस्या ज्योती पाटील, पं. स. सदस्य बाळेश नाईक, हेमंत कोलेकर, मीना पाटील आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशोक भोईटे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यकारी अभियंता अजय इनामदार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Give water to TMC five times to Ghatprabha Subdivision!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.