विनाअनुदानित शिक्षकांना न्याय द्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:26 IST2021-02-16T04:26:47+5:302021-02-16T04:26:47+5:30
मुंबईतील आझाद मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १८ दिवसांपासून राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची माजी ...

विनाअनुदानित शिक्षकांना न्याय द्या, अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील
मुंबईतील आझाद मैदानावर विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या १८ दिवसांपासून राज्यभरातील विनाअनुदानित शिक्षकांचे धरणे आंदोलन सुरू आहे. या आंदोलकांची माजी खासदार शेट्टी यांनी भेट घेतली. या शिक्षकांबाबतच्या सद्य:स्थितीला विद्यमान आणि पूर्वीचे सत्तेतील राज्यकर्ते जबाबदार आहेत. त्यांनी एकमेकांना दोष देणे थांबवावे. भारतीय संस्कृतीत गुरूला अनन्यसाधारण महत्त्व असून ते वंदनीय आहेत. मात्र, आज त्यांना हक्काचा पगार नाकारून राज्यकर्ते मोठे पाप करत आहेत. या प्रश्नांवर सर्व शिक्षक संघटना एकत्र येऊन शांततेत व सनदशीर मार्गाने लढा देत आहेत. या लढ्याला जर सरकार जुमानत नसेल, तर मग गनिमी कावा वापरून यश खेचून आणा. विनाअनुदानित शिक्षकांच्या हक्कासाठी लढणाऱ्या खंडेराव जगदाळे यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे माजी खासदार शेट्टी यांनी सांगितले. यावेळी विनाअनुदानित शिक्षक संघटनांच्या समन्वय संघाचे ज्ञानेश्वर शेळके, नेहा गवळी, दीपक कुलकर्णी, राहुल कांबळे, कर्तारसिंग ठाकूर, आदी उपस्थित होते.
चौकट
निधी असूनही सरकारचे दुर्लक्ष
राज्यातील सुमारे ६० हजार विनाअनुदानित शिक्षकांची गेल्या २० वर्षांपासून होत असलेली अवहेलना आणि शिक्षकांच्या अनुदानबाबतची सद्य:स्थिती समन्वय संघाचे समन्वयक खंडेराव जगदाळे यांनी यावेळी सांगितली. निधी उपलब्ध असूनही सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.
फोटो (१५०२२०२१-कोल-विनाअनुदानित शिक्षक) : विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करणाऱ्या विनाअनुदानित शिक्षकांची माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी भेट घेतली. यावेळी खंडेराव जगदाळे, आदी उपस्थित होते.