शेतकऱ्यांना ‘मातीचे हेल्थ कार्ड’ देणार
By Admin | Updated: December 28, 2016 01:06 IST2016-12-28T01:06:54+5:302016-12-28T01:06:54+5:30
राधामोहन सिंह : सिद्धगिरी मठावर किसान समृद्धी शिबिर

शेतकऱ्यांना ‘मातीचे हेल्थ कार्ड’ देणार
कोल्हापूर : आपण शेतीला जमिनीचा तुकडा नाही, तर आई मानतो. या आईरूपी शेतीचे आरोग्य तंदुरुस्त असेल, तरच तिचा मुलगा शेतकरी हा आर्थिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणार आहे. त्यामुळे शाश्वत शेतीसाठी शेतकऱ्यांना येत्या वर्षात मातीचे हेल्थ कार्ड (सॉईल हेल्थ कार्ड) देण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम केंद्र सरकारने हाती घेतला असल्याची माहिती केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी मंगळवारी येथे दिली.
कणेरी (ता. करवीर) येथील सिद्धगिरी मठ येथे आयोजित केलेल्या किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजप गोवंश विकास, पंचायत राजचे राष्ट्रीय संघटक हृदयनाथ सिंह होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार संजयकाका पाटील, खासदार कुुंवर पुष्पेंद्र सिंह चंदेल, भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष विजयपाल सिंह तोमर, आमदार सुरेश हाळवणकर, माजी मंत्री अण्णा डांगे प्रमुख उपस्थित होते.
कृषिमंत्री राधामोहन सिंह म्हणाले, ‘शाश्वत शेतीसाठी माती तपासणीसह तिचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सरकार कार्यरत आहे. याअंतर्गत आगामी वर्षात देशातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतीतील मातीचे नमुने घेऊन त्यांना माती हेल्थ कार्ड दिले जाईल. आतापर्यंत सुमारे दीड लाख माती नमुन्यांची तपासणी करून अश्ी कार्डे दिली आहेत. मार्च अखेरपर्यंत दोन कोटी २९ लाख जणांना अशी कार्डे दिली जातील.
देशात शाश्वत, जैविक, सेंद्रिय, परंपरागत आणि गो-पालन आधारित शेती करण्यास सरकारकडून प्राधान्य दिले जात आहे. यासाठी ५९७ कोटी खर्चाचे ‘उन्नत भारत अभियान’ सरकारने हाती घेतले आहे. ५० एकरांचा एक क्लस्टर असे दहा हजार क्लस्टर बनविण्याची योजना आहे. आतापर्यंत देशात ९११८ क्लस्टरचे काम झाले आहे.
कार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रास्ताविक केले. गोपालजी यांनी सूत्रसंचालन केले. आमदार अमल महाडिक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
‘लखपती शेती’
देशभर राबविणार
सिद्धगिरी मठाने साकारलेला ‘लखपती शेती’ हा उपक्रम शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारा आहे. केंद्र सरकारतर्फे पहिल्या टप्प्यात हा उपक्रम देशातील १०० गावांमध्ये राबविण्यात येणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, शेतीमधून कमीतकमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन वाढविण्यावर भर दिला आहे. शिवाय शेतीची उत्पादकता वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, वृक्षारोपण, देशी गार्इंचे संवर्धन व दूधवृद्धीसाठी गोकुळ मिशन व गोकुळ ग्राम, सेंद्रीय शेती प्रमाणीकरण, आदी उपक्रम सरकारने हाती घेतले आहेत. दरम्यान, मंत्री राधामोहन सिंग यांनी सिद्धगिरी मठाच्या लखपती शेती प्रकल्प, सौरशक्ती निर्जलीकरण कुटी व प्राकृतिक शीतकरण केंद्रास भेट देऊन पाहणी केली. किसान समृद्धी प्रशिक्षण शिबिरात देशभरातील सुमारे २५० शेतकरी सहभागी झाले होते. त्यांना या शिबिरात सेंद्रीय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.