गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करा
By Admin | Updated: May 28, 2015 00:57 IST2015-05-27T23:54:00+5:302015-05-28T00:57:58+5:30
सभासदांची मागणी : ‘गडहिंग्लज’ची अस्मिता जपण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी समन्वयाची भूमिका घेण्याचे आवाहन

गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करा
राम मगदूम - गडहिंग्लज -अमृतमहोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या गडहिंग्लज अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी समस्त सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतकांची मागणी आहे. ‘गडहिंग्लज’च्या वैभवशाली इतिहासात मोलाचे योगदान राहिलेल्या बँकेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी व विरोधकांनी समन्वयाची भूमिका घ्यावी, अशी तमाम गडहिंग्लजकरांची अपेक्षा आहे.१३ नोव्हेंबर १९५० रोजी करवीर संस्थानचे कारभारी रावबहादूर डी. बी. माळी यांनी बँकेची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष शिवपुत्राप्पा दड्डी, बंडाप्पा आजरी, आप्पासाहेब आजरी, शिवमूर्ती बंदी, शांताराम नाईक, दानाप्पा निडसोशी आदी प्रवर्तक मंडळींनी बँकेची मजबूत पायाभरणी केली. गडहिंग्लजची बाजारपेठ फुलविण्यासाठी बँकेने मोलाचे योगदान दिले. शहरासह तालुक्यातील लहान-सहान शेतकरी व व्यापाऱ्यांना बँकेने पाठबळ दिल्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांच्या गडहिंग्लज परिसरात सुबत्ता आली. माजी आमदार डॉ. घाळी यांनीही बँकेच्या मार्गदर्शकाची जबाबदारी यशस्वीरीत्या पेलली. पूर्वी दोन-तीन नव्या चेहऱ्यांना संधी देऊन बँकेची निवडणूक बिनविरोध केली जायची. बँकेच्या हिताशी कोणतीही तडजोड होत नव्हती. त्यामुळेच स्व. कित्तूरकरअण्णांना तब्बल २५ वर्षे अध्यक्षपद भूषविण्याचा मान मिळाला. दरम्यान, ‘चित्री’मुळे परिसरातील शेती उत्पन्न वाढून बाजारपेठेत पैसा खेळू लागला. त्यामुळे राष्ट्रीयीकृत व खासगी बँकांनी बँकिंग व्यवसायासाठी ‘गडहिंग्लज’ची निवड केली. शहरात आजमितीस एकूण १९ बँका व डझनभर पतसंस्था आहेत.
‘आजरा’पुढे..‘गडहिंग्लज’मागे !
गडहिंग्लजच्या तुलनेत आजरा गाव व बाजारपेठ लहान असूनही आजऱ्याच्या ‘आजरा अर्बन’ व ‘जनता अर्बन’ या बँकांनी कोकण व मुंबईपर्यंत शाखा काढल्या. मात्र, ‘गडहिंग्लज अर्बन’ अद्याप जिल्ह्याबाहेर जाऊ शकलेली नाही.
२५ कोटींचे सोने बँकेत
कर्नाटकातील हुक्केरी, चिक्कोडी व गोकाक या तालुक्यातील जनतेचा बँकेवर मोठा विश्वास आहे.
खास सोनेतारणासाठी ते ‘गडहिंग्लजला’ येतात. बँकेत सुमारे २५ कोटींचे सोनेतारण कर्ज आहे. यावरूनच बँकेची विश्वासार्हता अधोरेखित होते.
‘वीरशैव’देखील गडहिंग्लजची!
१९४२ मध्ये वीरशैव बँकेची स्थापनादेखील गडहिंग्लजमध्येच झाली. मात्र, कोल्हापुरातील व्यापारी मंडळींच्या मागणीमुळे बँकेचे मुख्यालय कोल्हापुरात स्थलांतरित झाले. त्यानंतर ‘गडहिंग्लज अर्बन’ची स्थापना झाली. तथापि, ‘गडहिंग्लज अर्बन’नंतर स्थापन झालेल्या ‘वारणा’ व ‘वडगाव’ बँकेच्या तुलनेतही ‘गडहिंग्लज अर्बन’ मागेच राहिली, याचीही कारणमीमांसा व्हायला हवी.
बिनविरोध का व्हावी ?
१० हजारांवर सभासद असणाऱ्या बँकेत सुमारे १६० कोटींच्या ठेवी आहेत.
निवडणूक लागून आरोप-प्रत्यारोप झालेस ठेवीदार बिथरण्याची शक्यता आहे.
महिलांनी यशस्वीरीत्या चालविलेली प्रियदर्शिनी बँक वगळता ही ‘गडहिंग्लज’ची एकमेव
बँक आहे.
गडहिंग्लजची ती अस्मिता आहे. त्यामुळेच निवडणूक बिनविरोध व्हायला हवी
१९८० च्या दशकात
बँकेत ‘राजकारणा’चा
प्रवेश झाला.
त्यानंतर दोन बिनविरोध निवडणुकांचा अपवाद वगळता सर्व निवडणुका गाजल्या. त्याचाच फटका बँकेच्या प्रगतीला बसला.