धुळीत हरवली ‘गंगावेश’
By Admin | Updated: January 23, 2015 23:36 IST2015-01-23T21:24:52+5:302015-01-23T23:36:07+5:30
गंगावेश चौकातील स्थिती : नागरिकांचे आरोग्य धोक्यात--‘लोकमत’-हेल्पलाईन

धुळीत हरवली ‘गंगावेश’
कोल्हापूर : शहरातील मुख्य रस्त्यांबरोबर प्रमुख चौकांत टाकण्यात आलेल्या खडीमुळे धूळ उडून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. विशेषत: गंगावेश चौक हे मध्यवर्ती ठिकाण होय. दिवस-रात्र या चौकामधून हजारो वाहने ये-जा करतात. या धुरळ्यामुळे नागरिकांसह व्यावसायिक त्रस्त झाले आहेत. ‘खड्डा बरा; पण धूळ नको,’ असे नागरिक आता म्हणू लागले आहेत.
अगोदरच शहरात सर्वत्र खड्डेच खड्डे आहेत. त्यांतील बऱ्यापैकी पॅचवर्क किंवा नवीन रस्त्याचे काम सुरू केले आहे; पण नवीन रस्ता तयार करण्यासाठी टाकण्यात आलेली खडी नागरिकांच्या जिवावर बेतत आहे. यामधून वाहने जात असल्याने तो धुरळा उडून नागरिकांना विकार होत आहे. गंगावेश चौकातून कोकणाकडे जाणारे ट्रक, टेम्पो तसेच रंकाळा बसस्थानकामधून जात असलेल्या एस. टी. बसेसमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनलिकेचे विकार होऊ लागले आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून या रस्त्यावर खडी पडून आहे. याचा त्रास नागरिकांसह व्यावसायिकांनाही सोसावा लागत आहे. त्यामुळे सुमारे २० ते ३० टक्के व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. तसेच घरातील प्रापंचिक साहित्यावरसुद्धा धूळ बसते आहे. त्याचबरोबर कौलारू घरांचा रंग बदलला आहे.
‘रास्ता रोको’चा इशारा... -- गंगावेश चौकात रहिवासी व व्यावसायिकांची वस्ती आहे. साधारणत: ५० व्यावसायिक आहेत. सततच्या वाहनांमुळे विशेषत: अवजड वाहनांमुळे धूळ उडते. यामुळे नुकताच परिसरातील नागरिक, व्यावसायिक यांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता; पण स्थानिक नगरसेविकेने लवकर पूर्ण रस्ता करू, असे आश्वासन दिल्याने रास्ता रोको करण्याचे स्थगित करण्यात आले असल्याचे नागरिकांनी सांगितले.
ठेकेदार गेला पळून...!
गंगावेश चौक ते साई मंदिर (रंकाळा बसस्थानक) या रस्त्याचे काम एका ठेकेदाराने घेतले आहे. या रस्त्यावर कच्ची खडी टाकली; पण महापालिकेने ठेकेदाराचे पैसे न दिल्याने संबंधित ठेकेदार अर्धवट काम टाकून पळून गेला आहे. त्यामुळे हा रस्ता कधी पूर्ण होणार आणि या धुरळ्यातून सुटका कधी होणार, अशी विचारणा नागरिक करू लागले आहेत.
व्यवसायावर परिणाम जाणवत आहे. महापालिकेने लवकरच प्राधान्यक्रमाने हा नवीन रस्ता पूर्ण करावा. जेणेकरून धुळीच्या त्रासातून मुक्ती मिळेल.
- अजय कसबेकर -जाधव, व्यावसायिक
धुळीच्या बचावापासून प्रत्येक नागरिकासह वाहनधारकांनी तोंडावर मास्क लावला पाहिजे. तसेच धूळ, अॅलर्जीचा प्रादुर्भाव होणार नाही, याची काळजी घ्यावी.
- डॉ. रमेश कुर्ले,
फिजिशियन, कोल्हापूर.