गडहिंग्लज कारखान्यात ‘राष्ट्रवादीचा पुनर्प्रवेश’!
By Admin | Updated: April 1, 2016 01:29 IST2016-04-01T01:20:32+5:302016-04-01T01:29:40+5:30
दशकानंतर संधी : सत्ताधारी आघाडीत पाच कार्यकर्त्यांचा समावेश--गडहिंग्लज साखर कारखाना निवडणूक

गडहिंग्लज कारखान्यात ‘राष्ट्रवादीचा पुनर्प्रवेश’!
राम मगदूम -- गडहिंग्लज तब्बल दशकानंतर गडहिंग्लज साखर कारखान्यात ‘राष्ट्रवादी’चा पुनर्प्रवेश झाला आहे. केवळ प्रवेशच नव्हे, तर कारखान्याच्या सत्तेत सहभागी होण्याची संधी राष्ट्रवादीच्या पाच कार्यकर्त्यांना मिळाली आहे. यामुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे.
१९८८ च्या निवडणुकीत कारखान्याचे संस्थापक स्व. आप्पासाहेब नलवडे यांच्या विरोधात शिंदे-कुपेकर-हत्तरकी एकत्र आले होते. त्यामुळे सत्तांतर होऊन कुपेकर गटाचा कारखान्यात पहिल्यांदाच प्रवेश झाला. त्यानंतर कुपेकर गटाचे डॉ. शरदचंद्र तथा कुमार शहापूरकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. दरम्यान, त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर अध्यक्षपदाची सूत्रे अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्याकडे आली. १९९३ च्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष शिंदे यांना हटविण्यासाठी नलवडे-कुपेकर एकत्र आले. त्यानंतरही कुपेकर गटाच्याच डॉ. प्रकाश शहापूरकर यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. दरम्यान, त्यांनी विधानसभेला बाबा कुपेकर यांनाच आव्हान दिले.
२००० च्या निवडणुकीत तत्कालीन अध्यक्ष डॉ. शहापूरकर यांना हटविण्यासाठी एकत्र आलेल्या ‘शिंदे-कुपेकर’ आघाडीने बाजी मारली. त्यानंतर अध्यक्षपदी शिंदे यांची, तर उपाध्यक्षपदी कुपेकर गटाच्या प्रकाश चव्हाण यांची निवड झाली. दरम्यान, चव्हाण यांनीदेखील विधानसभेला कुपेकर यांच्या विरोधात बंडखोरी केली. २००५ च्या निवडणुकीत सत्ताधारी शिंदे-चव्हाण-हत्तरकी आघाडीच्या विरोधात कुपेकर व शहापूकर गट असा तिरंगी सामना झाला. विधानसभेच्या अध्यक्षपदावर असतानाही कुपेकर यांनी कारखान्याची निवडणूक लढविली. मात्र, त्यांच्यासह त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनेलला दारुण पराभव पत्करावा लागला. तेव्हापासून या निवडणुकीपर्यंत कारखान्यात राष्ट्रवादीचा एकही संचालक नव्हता. तथापि, बदलत्या राजकारणाचा वेध घेत आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी कारखान्याचे माजी अध्यक्ष शिंदे यांच्याशी युती केली. त्यामुळेच मुश्रीफ-शिंदे-कुपेकर-नलवडे यांच्या आघाडीला कारखान्याची सत्ता मिळाली. संचालक मंडळाच्या १९ पैकी ११ जागा या आघाडीला मिळाल्या. त्यात राष्ट्रवादीचे पाच संचालक आहेत.
स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात झालेल्या पोटनिवडणुकीसह सार्वत्रिक निवडणुकीतदेखील आमदार मुश्रीफ यांनी संध्यादेवी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ दिले. किंबहुना, त्यामुळेच गडहिंग्लज कारखान्यात राष्ट्रवादीचा दमदार पुनर्प्रवेश झाला आहे.
आमदार मुश्रीफ व कुपेकर यांचा मुत्सद्दीपणा व बेरजेच्या राजकारणामुळेच राष्ट्रवादीला तब्बल दहा वर्षांनंतर कारखान्यात पुनर्प्रवेश मिळाला आहे. सत्ताधारी ‘मुश्रीफ-शिंदे-कुपेकर-नलवडे’ आघाडीत सर्वाधिक पाच संचालक राष्ट्रवादीचे आहेत.
मुश्रीफ-शिंदे-कुपेकर यांना एकत्र आणण्यात जयसिंग चव्हाण, सतीश पाटील व अमर चव्हाण यांनी भूमिका बजावली. प्रसंगी पत्नीची उमेदवारी मागे घेऊन जयकुमार मुन्नोळी यांनीही त्यांना मोलाची साथ दिली.