इस्लामपुरात आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: December 18, 2014 00:00 IST2014-12-17T23:44:10+5:302014-12-18T00:00:46+5:30
स्टुडंट फेडरेशनचा पुढाकार : नकारात्मक गुणपद्धती रद्द करण्याची मागणी

इस्लामपुरात आयटीआयच्या विद्यार्थ्यांचा मोर्चा
इस्लामपूर : औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामध्ये (आयटीआय) प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अवलंबण्यात आलेली नकारात्मक गुण पध्दती शासनाने रद्द करावी, यासह इतर मागण्यांसाठी आज स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियाच्या पुढाकाराने येथील तहसील कचेरीवर मोर्चा काढण्यात आला.
बहे रस्त्यावरील औद्योगिक वसाहतीतील शासकीय आयटीआयपासून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून पेठ रस्त्यावरील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसील कचेरीवर धडकला. तेथे उमेश देशमुख, राजेंद्र वाटकर, जीवन मस्के, आकाश गवळी, सूरज पवार, अमित साळुंखे यांनी तहसीलदारांना मागण्यांचे निवेदन दिले.आयटीआयसाठी सुरू केलेली अन्यायकारक नकारात्मक गुणपध्दती रद्द करा, या गुण पध्दतीमुळे विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढले आहे. आयटीआयचे प्रशिक्षण घेणाऱ्या सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत आहे. या पध्दतीमुळे त्यांची शाश्वत नोकरी नाकारण्यातला प्रकार आहे. प्रश्नपत्रिका मराठीतून द्यावी, महागाई निर्देशांकानुसार विद्यावेतनामध्ये वाढ करावी, बी. टी. आर. आय. सेंटर पूर्ववत सुरू करावीत, सर्व अभ्यासक्रमासाठी पूर्णवेळ शिक्षकांची नेमणूक करावी, सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश द्यावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)