आयटीआय विद्यार्थ्यांचा मोर्चा
By Admin | Updated: December 9, 2014 00:30 IST2014-12-09T00:06:58+5:302014-12-09T00:30:03+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय : नकारात्मक गुणपद्धती रद्द करण्याची मागणी, विद्यार्थ्यांनीच केले नेतृत्व

आयटीआय विद्यार्थ्यांचा मोर्चा
कोल्हापूर : गेल्या कित्येक वर्षांपासून तेच मोर्चे, तेच नेतृत्व, मोर्चात दिसणारे तेच चेहरे, तेच शिष्टमंडळ आणि तीच चर्चा याला कंटाळलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांना आज एका वेगळ्या परंतु शिस्तबद्ध मोर्चाचा अनुभव घ्यावा लागला. मोर्चा होता विद्यार्थ्यांचा आणि घोषणा होती अर्थातच.... ‘इन्कलाब झिंदाबाद’ ! शैक्षणिक क्षेत्रात गेल्या वर्षापासून विद्यार्थ्यांना भेडसावत असलेल्या प्रश्नावरील या मोर्चाने शिस्तबद्धतेचे दर्शन घडविलेच, शिवाय मोठ्या घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालय परिसरही दणाणून सोडला.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या अनेक संघटनांचे काम फक्त कागदोपत्रीच राहिले आहे, त्यामुळे अलीकडच्या काही वर्षांत विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नांवर मोर्चा काढल्याच्या घटना घडलेल्या नाहीत, परंतु आज, सोमवारी कोल्हापुरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आय.टी.आय.) शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रश्नावर मोर्चा काढला. अर्थात त्याचे नेतृत्वही विद्यार्थ्यांनीच केले.
परीक्षेमधील नकारात्मक गुणाची पद्धत रद्द करावी, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीबरोबरच मराठीतून दिल्या पाहिजेत, आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया आॅनलाईनऐवजी प्रत्येक आयटीआयमध्येच करावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी विषयजोड प्रश्नपत्रिका व एकत्रित पासिंग पद्धत बंद करून विषयवार स्वतंत्र प्रश्नपत्रिका व पासिंग पद्धत लागू करावी, विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून निदेशकांच्या जागा त्वरित भराव्यात, नापास विद्यार्थ्यांच्या तातडीने फेरपरीक्षा घेण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला.
कळंबा येथील आय.टी.आय.च्या मुख्य कार्यालयापासून मोर्चातील सुमारे पाचशेहून अधिक विद्यार्थी पायी चालत घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत गेले. ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘लय लय भ्रष्टाचार, लय लय अत्याचार’ या दोन घोषणांनी लक्ष वेधून घेतले. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यावर पोलिसांनी अडविला. विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांना मागण्यांचे निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत संबंधितांना माहिती कळविण्यात येईल, असे चव्हाण यांनी सांगितले.
स्टुडंटस् फेडरेशन आॅफ इंडियाच्या झेंड्याखाली निघालेल्या या मोर्चाचे नेतृत्व दत्ता चव्हाण, सुभाष जाधव, उमेश देशमुख, निखील कांबळे, ओमकार रेडेकर, रोहित कडलगे, अक्षय सुतार, भारत कांबळे, वैभव मोहिते, राहुल पाटील, गणेश शिंदे, रामदास जाधव, उद्धव चौगुले, तानाजी आगळे, रोहित मानकर, अक्षय गोसावी, विशाल गुरव, प्रियंका कांबळे, धनश्री पाटील यांनी केले. (प्रतिनिधी)
इन्कलाब झिंदाबाद...
आय.टी.आय. परीक्षेमधील नकारात्मक गुण देण्याची पद्धत रद्द करावी, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका इंग्रजीबरोबरच मराठीतून दिल्या पाहिजेत, आय.टी.आय. प्रवेश प्रक्रिया आॅनलाईनऐवजी प्रत्येक आयटीआयमध्येच करावी, विद्यार्थ्यांच्या परीक्षेसाठी विषयजोड प्रश्नपत्रिका व एकत्रित पासिंग पद्धत बंद करून विषयवार स्वतंत्र प्रश्नपत्रिका व पासिंग पद्धत लागू करावी, निदेशकांच्या जागा त्वरित भराव्यात, नापास विद्यार्थ्यांच्या तातडीने फेरपरीक्षा घेण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
नकारात्मक गुणपद्धतीचा फटका गेल्यावर्षी विद्यार्थ्यांना बसला. त्यामुळे केवळ आठ टक्के निकाल लागला होता. भविष्यातही असाच फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे ही पद्धत रद्द केली पाहिजे. त्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत.
- नीलेश नाईकवडे, विद्यार्थी
नकारात्मक गुणपद्धती अत्यंत बिनडोकपणे केंद्र सरकारने अवलंबली आहे. शिक्षक, प्राध्यापकांनी विरोध केला तरीही तो जुमानला नाही. विद्यार्थ्यांना मराठीत शिकविले जाते आणि प्रश्नपत्रिका मात्र इंग्रजीत दिल्या जातात, हे चुकीचे आहे. गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक संस्था बंद पाडण्याचा हा डाव आहे.
- प्रा. सुभाष जाधव