घोरपडे कारखान्याचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: December 6, 2014 00:46 IST2014-12-06T00:37:31+5:302014-12-06T00:46:50+5:30
हायकोर्टाचा निकाल : गळितावरील स्थगिती उठविली; मंडलिक कारखान्यास दंड

घोरपडे कारखान्याचा मार्ग मोकळा
कागल : कागल तालुक्यासह जिल्ह्यातील साखर कारखानदारीचे लक्ष लागून राहिलेल्या सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगाम स्थगितीविषयी न्यायालयीन निकाल अखेर आज, शुक्रवारी जाहीर झाला. उच्च न्यायालयाने १० आॅक्टोबर रोजी दिलेली स्थगिती उठविली. याचिका दाखल करणाऱ्या सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्यास एक लाख रुपयांचा दंडही ठोठावला. दुपारी या निकालाची बातमी कागल तालुक्यात येताच मुश्रीफ गटाच्या समर्थकांनी गावागावांत फटाक्यांची आतषबाजी करीत आनंद व्यक्त केला.
बेलेवाडी काळम्मा येथील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या विरोधात हवाई अंतर, ऊस उपलब्धता, परवाने, या मुद्द्यांवर हमीदवाडा येथील मंडलिक कारखान्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ऐन विधानसभा निवडणुकीतच न्यायालयाने १० आॅक्टोबर रोजी गळीत हंगाम घेण्यास मनाई आदेश दिला. त्यानंतर १४ आॅक्टोबर, २० नोव्हेंबर, २६ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर, अशा सुनावणीच्या तारखा वाढत गेल्या. आज सकाळी १२ वाजल्यापासून तालुकाभर निकालाचे काय झाले, याची चौकशी सुरू होती. दु. ३.१५ ला मुख्य न्यायाधीश न्या. मोहित शहा, न्या. कुलाबावाला यांच्या खंडपीठाने गळीत हंगामासाठी स्थगिती उठविली. कारखान्यातर्फे अॅड. जहागिरदार, अॅड. दाणी, अॅड. पटवर्धन, अॅड. खलिदी यांनी काम पाहिले. गळीत हंगामाची स्थगिती उठविल्याचे समजताच मुश्रीफ समर्थकांनी जल्लोष केला, तर गळीत हंगाम तातडीने सुरू करण्यासाठी ऊस तोडणी यंत्रणा आणि इतर यंत्रणा सक्रिय करण्यात आली.
लवकरच मोठा कार्यक्रम : मुश्रीफ
हंगामाचा शुभारंभ शरद पवार आणि विक्रमसिंह घाटगे यांच्या हस्ते करणार होतो. मात्र, न्यायालयीन स्थगितीमुळे हे करता आले नाही. उद्याच मी विक्रमसिंहराजेंना भेटणार असून लवकरच कारखाना कार्यस्थळावर मोठा कार्यक्रम होणार असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले.
चिकोत्रा खोऱ्यात आतषबाजी
दरम्यान, घोरपडे साखर कारखान्याच्या गळीत हंगामास दिलेली स्थगिती उठविल्याचे वृत्त चिकोत्रा खोऱ्यात दुपारी पोहोचताच गावोगावी फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करून कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. तसेच मुरगूड, म्हाकवेसह बानगे, आणूर, बस्तवडे, परिसरात मुश्रीफ समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.