मुक्त विद्यापीठाच्या निकालात चुकांचा मुक्त संचार
By Admin | Updated: August 31, 2015 00:08 IST2015-08-31T00:08:37+5:302015-08-31T00:08:37+5:30
शेकडो विद्यार्थ्यांना फटका : अंतिम वर्षात शिकणारे प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता, तक्रारदारांना दीड महिन्यानंतरही सुधारित निकाल मिळालेला नाही

मुक्त विद्यापीठाच्या निकालात चुकांचा मुक्त संचार
संदीप खवळे - कोल्हापूर
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने मे २०१५ मध्ये घेतलेल्या परीक्षेचा आॅनलाईन निकाल जाहीर होऊन दीड महिना झाला़ या निकालात बी़ ए़ आणि बी़ कॉम.च्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांमध्ये अनेक चुका आढळून आल्या आहेत़
अनेक निकालपत्रकांमध्ये काही विषयांचे गुणच दाखविलेले नाहीत़ असाईनमेंटचे गुणच दिलेले नाहीत़ सुधारित निकालासाठी दीड महिन्यांपूर्वी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना अजूनही सुधारित निकाल मिळालेला नाही़ परिणामी बी़ ए़ आणि बी़ कॉम.च्या अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची पुढील प्रवेशाची गोची झाली आहे़
बी़ ए़ आणि बी़ कॉम.च्या अंतिम वर्षात शिकणाऱ्या कोल्हापूर शहरातील एकाच केंद्रातील १४ विद्यार्थ्यांना याचा फटका बसला आहे़ जिल्ह्याचा विचार केला असता ही संख्या शेकडोंच्या घरात जाण्याची शक्यता आहे़ मुक्त विद्यापीठाचे कोल्हापूर विभागीय केंद्र आणि नाशिक येथील मुख्य कार्यालयाशी
ई-मेलद्वारे आणि लेखी पत्रव्यवहार करूनही या विद्यार्थ्यांना निकालपत्रक मिळालेले नाही़ अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुधारित निकालपत्रक न मिळाल्यामुळे शिवाजी विद्यापीठाची एम़ बी़ ए.ची प्रवेश परीक्षा देता आलेली नाही़
मुक्त विद्यापीठाच्या संकेतस्थळावर तक्रार नोंदविण्याची मुदतही संपून गेली आहे़ त्यामुळे लेखी अर्ज देण्याशिवाय विद्यार्थ्यांना पर्याय नाही़ लेखी अर्जानंतरही विद्यार्थ्यांना पंधरा दिवसांनी गुणपत्रिका मिळणार असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे यंदाचे वर्ष वायाच जाण्याची भीत् विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका का मिळत नाहीत, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे़
़मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवरील तक्रार निवारण आॅप्शनमध्ये विद्यार्थ्यांना निकालासंबंधीच्या तक्रारींचा तपशील मांडण्याची सोय आहे़ हा आॅप्शन बारमाही खुला आहे़ निकालातील चुका दुरुस्त करून संबंधित केंद्रांना निकालपत्रके देण्यात आली आहेत़ विविध शाखांतील तृतीय वर्षांत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मोजकेच निकाल प्रलंबित आहेत़ सुधारित निकाल करण्याचे काम सुरू आहे़ कुंभमेळ्यामुळे नाशिकमधील काम ठप्प आहे़ लवकर या विद्यार्थ्यांना सुधारित निकालपत्रके देण्यात येतील.
- डॉ़ अर्जुन घाटुळे, परीक्षा नियंत्रक,
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, नाशिक