नगरपंचायतीची चार वर्षांपासून केवळ चर्चाच
By Admin | Updated: September 7, 2015 22:25 IST2015-09-07T22:25:51+5:302015-09-07T22:25:51+5:30
आजरा ग्रामपंचायत : ‘नगरसेवक’ होण्याची स्वप्ने पडू लागल्याने इच्छुकांचे गुडघ्याला बाशिंग

नगरपंचायतीची चार वर्षांपासून केवळ चर्चाच
ज्योतीप्रसाद सावंत --आजरा ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होणार अशी गेली चार वर्षे सुरू असलेली
चर्चा आजही कायम आहे. नगरपंचायत होणार अशी चर्चा जरी असली, तरी अनेकांना आपण ‘नगरसेवक’ होणार अशी स्वप्ने पडू लागल्याने आपल्याशिवाय (?) शहराचा विकास होऊच शकत नाही, असे गृहीत धरून गुडघ्याला बाशिंग बांधून अशी मंडळी तयार आहेत.तीन वर्षांपूर्वी आजरा ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक झाली. यावेळी वर्षभरात ग्रामपंचायतीची नगरपंचायत होणार, अशी चर्चा जोरात होती. तंटामुक्त समितीच्या पुढाकाराने हेच कारण पुढे करून बिनविरोधचे प्रयत्न झाले, परंतु निवडून येण्याची क्षमता असणारी मंडळी बिनविरोधच्या प्रयत्नात डावलले जाणार असल्याचा अंदाज आल्याने थेट निवडणूक रिंगणात उतरली व यापैकी बरीचशी निवडूनही आली.नगरपंचायतीची टांगती तलवार असल्याने सरपंचपदाची संधी आपणालाच प्रथम मिळावी यासाठी सुरू असलेली स्पर्धा आजही कायम आहे. दरम्यान, या स्पर्धेमुळेच तीन वर्षांत चार महिला सरपंच झाल्या. अद्यापही नगरपंचायतीचा प्रस्ताव शासनदरबारी धूळ खात पडून आहे. प्रस्ताव पुढे रेटण्यास राजकीय उदासीनता कारणीभूत ठरत आहे.
सद्य:स्थितीत ग्रामपंचायतीचा कालावधी जसजसा संपत चालला आहे, तसतशी पुन्हा नगरपंचायतीची चर्चा सुरू झाली आहे. नगरसेवक बनण्यासाठी अनेकांनी ‘पेरणीही’ सुरू केली आहे, तर बरेचजण आपण नगरसेवकच नव्हे तर पहिले ‘नगराध्यक्ष’
होणार, अशा बढायाही मारू लागले आहेत.
साहेब.. नगरपंचायतीचे काम झाले ?
आजरा ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजन दड्डीकर यांच्याकडेही इच्छुकांकडून वारंवार साहेब नगरपंचायतीचे काय झाले? अशी विचारणा होते, पण या प्रश्नाचे उत्तर तूर्तास त्यांच्याकडेही नाही.