कुमारवयातच व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी
By Admin | Updated: December 2, 2014 00:12 IST2014-12-02T00:09:44+5:302014-12-02T00:12:02+5:30
शुभदा दिवाण : कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे चर्चासत्र

कुमारवयातच व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी
कोल्हापूर : कुमारवयात मुलांच्या व्यक्तिमत्त्वाची पायाभरणी होत असताना त्यांची ध्येय-निश्चितीही होणे गरजेचे असते, त्यांच्या आयुष्याची दिशा ठरविण्याचे महत्त्व जाणून घेऊन त्यांना योग्य आदर्शाकडे वळवायला हवे. त्यासाठी पालकांनी आवर्जून प्रयत्न करायला पाहिजेत, असे प्रतिपादन समुपदेशक डॉ. शुभदा दिवाण यांनी किले.
कोल्हापूर मेडिकल असोसिएशनतर्फे रविवारी ‘पौगंडावस्था व सुजाण पालकत्व’ या विषयावर आयोजित पालकसभा व मार्गदर्शन सत्रात त्या बोलत होत्या. दिवाण म्हणाल्या, अनेकजण पौगंडावस्था ही आयुष्यातील एक वादळी कालखंड, असे म्हणतात, पण हा कालखंड म्हणजे आयुष्यातील सर्वांत चांगला काळ असतो. या वयात कुमार वयाचे बंधन नसते की, प्रौढपणाची जबाबदारी नसते. त्यामुळे पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी हितगुज केले पाहिजे.
‘पौंगडावस्थेची ओळख’ या विषयावर बोलताना डॉ. दीपा कित्तूर म्हणाल्या, मुलांना सांगा मी तुझ्या बरोबर आहे, तू काळजी करू नकोस, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुझ्या वयातसुद्धा मी हेच अनुभवले आहे. हे त्याला पटवून द्या. त्यांच्यावर तुमच्या इच्छा लादू नका, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
डॉ. निखिल चौगुले यांनी ‘मुलांची वर्तन समस्या’ या विषयावर मार्गदर्शन करताना म्हणाले, या वयात मुलांची मानसिकता आई-वडील जे सांगतात ते चुकीचे आहे असे वाटते, तर आपले मित्र-मैत्रिणी जे सांगतात ते बरोबर आहे वाटत असते. त्यामुळे पालकांनी मित्र किंवा मैत्रिण बनून संवाद साधावा. याप्रसंगी तांबोळी यांच्या एच.आय.व्ही / एड्स सर्वांसाठी या पुस्तकाचे प्रकाशन
डॉ. आनंद कामत यांच्या हस्ते करण्यात आले. कम्युनिटी सर्व्हिसचे चेअरमन डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. नीता नरके यांनी आभार मानले. कार्यक्रमास . विद्या ठाकूर, डॉ. राजीव कुलकर्णी यांच्यासह पालक उपस्थित होते.
रक्त परीक्षा केलीच पाहिजे : तांबोळी
ज्येष्ठ समाजसेवक भालचंद्र तांबोळी यांच्या ‘एच.आय.व्ही/ एड्स’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, अजूनही आपल्याकडे लैंगिक शिक्षणाची अर्धवट माहिती आहे. पालकांना मुलांशी या विषयावर बोलण्याचा संकोच वाटतो. लग्न ठरविताना जशी पत्रिका पाहतो. त्याचप्रमाणे मुला-मुलींची रक्त परीक्षाही केलीच पाहिजे. यासाठी सक्ती करण्याचा कायदा अंमलात आणला पाहिजे.