बेनिक्रेच्या पाणी योजनेला वनखात्याचे कुंपण
By Admin | Updated: September 3, 2015 23:52 IST2015-09-03T23:52:00+5:302015-09-03T23:52:00+5:30
पाण्याचे दुर्भिक्ष्य : लघु पाटबंधाऱ्यात अपुरा पाणीसाठा, ४00 फूट लांबीच्या पाईप खुदाईला परवानगी नाही

बेनिक्रेच्या पाणी योजनेला वनखात्याचे कुंपण
म्हाकवे : बेनिक्रे (ता. कागल) येथील पाणीटंचाईतून मुक्त होण्यासाठी ज्योतिर्लिंग पाणी वापर संस्थेच्या प्रयत्नातून वेदगंगा नदीवरून सुरुपली येथून स्वतंत्र पाणी योजना पूर्णत्वाकडे गेली आहे. मात्र, केवळ वनखात्याच्या हद्दीतील ४०० फूट लांबीच्या पाईप खुदाईला या खात्याने अद्याप परवानगीच न दिल्याने ही योजना अडखळली आहे. वनखात्याने येथील ग्रामस्थांच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेऊन त्वरित परवानगी दिल्यास केवळ महिनाभरात ही योजना कार्यान्वित होऊ शकते, अशी स्थिती आहे.२०१३ मध्ये गावातील शेतकऱ्यांनी सामूहिकपणे कर्ज घेऊन सर्वच शेती ओलिताखाली आणण्यासाठी शासनाशी निखराची झुंज देऊन सुरुपली येथून वेदगंगेतून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळविली. सुमारे अडीच कि.मी. अंतराच्या आणि सव्वातीन कोटी रुपये खर्चाच्या या पाणी योजनेचे काम अतिशय जलदगतीने करण्यात आले. नदीतून पाणी पाईपद्वारे येथील लघु पाटबंधारे प्रकल्पात टाकायचे आणि तेथून शेतीसह पिण्यासाठी वापरायचे असे नियोजन आहे. विशेष बाब म्हणजे पाणी योजनेसाठी लागणारा सर्व निधी शेतकऱ्यांनी कर्ज स्वरूपात उभा केला आहे.
दरम्यान, येथील ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्थाही अतिशय काटेकोरपणे पाण्याचा वापर करीत आहे, परंतु यंदा अपुऱ्या पावसामुळे या प्रकल्पात पाणीसाठाच झालेला नाही. वेदगंगेतून आलेली पाणी योजना पूर्ण होण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष आण्णासाहेब वाडकर, उपाध्यक्ष गणपती इंगळे, बाळासाहेब शिंदे, रवी पाटील, वसंत जाधव, सचिव रवींद्र वाडकर, आदी शासनदरबारी हेलपाटे घालून पाठपुरावा करीत आहेत.
परवानगीसाठी नागपूरकडे धाव
रहिवासी इथले, गायरान, शेतकरी, शेती, पाणी इथले; मात्र वनखात्याच्या हद्दीतून पाणी योजना नेण्यासाठी नागपुरातील अधिकारी परवानगी देणार, ही आश्चर्यकारक बाब आहे. तरीही शासकीय रितसर परवानगीचा सोपस्कार पूर्ण करण्यासाठी ग्रामस्थांनी नागपूर येथील कार्यालयात कागदपत्रे पोहोचवून पाण्याच्या दुर्भिक्ष्यापासून बचावासाठी प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
शेतकऱ्यांच्या योगदानातून कोणत्याही शासकीय निधीशिवाय वेदगंगेतून पाणी योजना करण्याचे शिवधनुष्य उचलले आहे. वनखात्याच्या हद्दीतील केवळ ४०० फूट खुदाई करण्यासाठी नागपूर येथील कार्यालयात आम्ही फेऱ्या मारत आहोत. ही योजना त्वरित पूर्ण होऊन शेतीच्या उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे, अन्यथा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होणार आहे.
- रवींद्र वाडकर, सचिव, ज्योतिर्लिंग पाणीपुरवठा संस्था