पन्हाळ्यात महापुराने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:26 IST2021-09-23T04:26:04+5:302021-09-23T04:26:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पोर्ले तर्फ ठाणे : पोषक वातावरणामुळे जोमात आलेले पन्हाळा तालुक्यातील कुंभी आणि कासारी नदीकाठचे ऊसपीक महापुराने ...

The floods in Panhala broke the backs of the farmers | पन्हाळ्यात महापुराने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

पन्हाळ्यात महापुराने शेतकऱ्यांचे मोडले कंबरडे

लोकमत न्यूज नेटवर्क

पोर्ले तर्फ ठाणे : पोषक वातावरणामुळे जोमात आलेले पन्हाळा तालुक्यातील कुंभी आणि कासारी नदीकाठचे ऊसपीक महापुराने कोमात गेले आहे. दिवसमान सरतील तसे ऊस नुकसानीची तीव्रता गडद होत आहे. तसेच महापुराच्या प्रवाहाने पडलेले विजेचे खांब उभारताना तांत्रिक अडचणी येत असल्याने महावितरणसाठी आव्हान बनत आहे. शेंडा कुजून कोंब फुटलेल्या उसाच्या उत्पादनात कमालीची घट होणार असल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी येत आहे. महापुरात नुकसानभरपाईची प्रतीक्षा आणि पुराने गेलेले शेत लवकर मोकळे कसे होईल? या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

कुजून फुटवे फुटलेला ऊस साखर कारखान्याने प्राधान्याने तोडला नाही, तर उसाच्या फुकण्या होऊन त्याचे जळण होणार आहे.

कारखान्याचा हंगाम सुरू होण्यासाठी अजून दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. उत्पादनासाठी घातलेला खर्च शेतकऱ्यांच्या अंगावर येणार आहे. शिवाय नुकसानभरपाई कशी आणि कधी मिळणार, आहे याची शाश्वती नाही; परंतु रान मोकळे करून दुसऱ्या पिकासाठी झटावे लागत आहे.

म्हणून छोट्या शेतकऱ्यांनी बुडीत क्षेत्रातील उसाला कापणी लावून जनावरांचा चारा बनवत आहे. बुडीत क्षेत्रातील ऊस गुळासाठी अयोग्य असल्याने साखर कारखान्यांशिवाय बुडीत उसाला पर्याय नाही; परंतु साखर उतारा आणि इतर अडचणींमुळे साखर कारखाने चांगला आणि बुडीत उसाची टक्केवारीनुसार तोडणी करणार असल्याचे समजते. त्यामुळे २०१९ मध्ये गेलेल्या उसाच्या तोडणीचा अनुभव या हंगामात शेतकऱ्यांना अनुभवायला मिळणार आहे.

महापुराच्या प्रवाहात नदीकाठच्या विजेचे खांब पडून डीपी खराब झाले आहेत. मधल्या उघडिपीत महावितरणने दुरूस्तीचे काम सुरू केले होते. पावसाचा अडथळा, वाटेची अडचण यांसह तांत्रिक अडचणींमुळे राहिलेले दुरूस्तीचे काम लांबणीवर पडणार आहे. परिणामी उरलासुरला माळरानावरील आणि नदीकाठचा ऊस पाण्याअभावी वाळल्यामुळे उत्पादनात घट येणार आहे.

बुडक्याचे होणार खोडवे

पावसाच्या असमानतेचा आणि सततच्या पुराचा फटका नदीकाठाला बसत आहे. २०१९ च्या नुकसानीपेक्षा २०२१ च्या मातीमिश्रित गाळयुक्त पाण्याच्या महापुराने मोठ्या प्रमाणात उसाचे नुकसान झाले आहे. बुडीत क्षेत्रातील शेंडा कुजून कोंब फुटलेला ऊस जगला असला, तरी त्याच्या पोषक वाढीवर परिणाम झाल्याने उसाच्या उत्पादनात घट येणार आहे. तसेच फुटवे न सुटलेला उसाचा बुडका वाळत जाऊन त्याचे खोडवे बनत आहे.

प्रतिक्रिया

पुराचे पाणी वाढू नये आणि वाढले तर लवकर ओसरावे, यासाठी शासनाने कायमची उपाययोजना करावी. गेलेल्या उसाचे खोडवे पीक घेता येत नाही. शेत लवकर मोकळे केले तरच शेतकरी उसाचे दुसरे पीक लवकर घेऊ शकतो. साखर कारखान्याने शासनाने बुडीत क्षेत्रातील ऊस लवकर तोडण्यासाठी सक्ती करावी.

विजय आडनाईक, शेतकरी, यवलूज, ता.पन्हाळा

..............

दालमिया प्रशासनाने शेतकऱ्यांबाबत नेहमी सकारात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दालमिया कारखान्याशी संलग्न असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बुडीत उसाला प्राधान्याने तोडणी दिली जाईल. दालमिया प्रशासनाकडून शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना यापूर्वी होती आणि येथून पुढेही होत राहील.

एन. सी. पालीवाल, युनिटहेड, दालमिया आसुर्ले-पोर्ले

............

दृष्टिक्षेपात नुकसान

बाधित शेतकऱ्यांची संख्या- २८००२ बाधित क्षेत्र (हेक्टर) - ६,९०९

नुकसान रक्कम - २६ कोटी ८० लाख

बाधित ऊस क्षेत्र - ६, ३२२

२२ पन्हाळा



पन्हाळा तालुक्यातील कासारी नदीला आलेल्या महापुरात नदीकाठचा कुजलेला ऊस वाळून त्याचे खोडवे बनत आहे.

Web Title: The floods in Panhala broke the backs of the farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.