मानवतेचा पूर यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:00 AM2019-08-19T00:00:24+5:302019-08-19T00:00:29+5:30

इंद्रजित देशमुख महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार ...

 The flood of humanity | मानवतेचा पूर यावा

मानवतेचा पूर यावा

Next

इंद्रजित देशमुख

महाराष्ट्रातील एका मोठ्या प्रांतात म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात पावसानं आणि महापुरानं अगदी थैमान घातलं आहे. डोळ्यादेखत बुडणारे संसार आणि उद्ध्वस्त होणारी स्वप्नं बघून जीव अक्षरश: कातरला जातोय. या कातरण्यातच अनंत काहुरांची कधीच न संपणारी मालिका मनात विचारांचा डोंगर उभा करून जाते. पाऊस भयानक, पावसामुळे जीवनदायिनी असलेल्या नद्यांची दिसणारी रूपेही भयानक आणि या भयानक रूपातून निर्माण झालेला महापूरही भयानक आणि त्या भयानकतेमुळे जीवनात आलेलं केविलवाणेपण तर त्याहूनही भयानक, अशी आमची अवस्था झाली आहे. वास्तविक पाणी म्हणजे जीवन असतं ते आम्हाला जगवत असतं. पण आज हेच जगवणारं पाणी कितीतरी जणांचा जीवन संपवू पाहतंय. याचंच खूप वाईट वाटत आहे आणि मन खूप विषण्ण होत आहे. याच विषण्णतेत भर घालण्यासाठी म्हणून की काय कुठे कुठे महापुराच्या पाण्याबरोबर व्यापक न झालेली संकुचित मनंही पाहायला मिळत आहेत.
वास्तविक जगातलं कुठलंही संकट इतकं गंभीर कधीच असू शकत नाही की जे आमचा धीर संपवेल; पण हा महापूर बघून आता मन खरोखरच घाबरायला लागलंय. भोवताली भग्न अवस्थेतील बांधकाम आणि विस्कटलेले संसार यामुळे होत्याचं न्हवतं झालेली कितीतरी चिन्हे आम्हाला बघायला मिळत आहेत. आणि आता सगळंच गेलं. त्यामुळे जीवनातील नाउमेद वाढवणारी मनोवृत्ती तयार होत आहे, हे असं असलं तरी एखाद्या वावटळात दिवा लागावा त्याप्रमाणे आपलं स्वत:च तन-मन-धन अर्पण करून माणुसकीच्या महापुराचं दर्शन घडवणारं कुणी उभं राहतंय का आणि स्वत:सोबत इतरांना
पूर काय येईल जाईल
म्हणून का गळायचं।
झटत झगडत जगू
नाही गा पळायचं।
परत उभं करू सारं
मागं नाही वळायचं।
धिटाई मनात धरू
नाही चिंतेत जळायचं।
हिंमतीनं ताकदीनं फुलवू
संसार आणि बांधू नवं घर।।
जाईल महापूर दादा, जाईल महापूर।
जाईल महापूर दादा, नको सोडू धीर।।...
असा धीर देत काही गोष्टीची मनं आतुरतेने वाट पाहत असत. तेवढ्यात आपल्या जवळचे दीदी आणि दादा पूर आणि पाण्यात उभं राहून इतरांचे संसार उभे करण्यासाठी धडपडत असल्याचं कळलं की डोळे आपोआप भरून येतात आणि जीवनाबद्दलचा सकारात्मक भाव वाढीस लागतो. संपत्तीसंचयाच्या पलीकडे सुद्धा एक देखणं विश्व आहे आणि तेच विश्व या जगातील अंतिम सत्य आहे, याची आपोआप प्रचिती या लोकांचं काम बघून जाणवते.
जीवनात संकटं तर येतच असतात, पण अशा संकटातसुद्धा एखादी संधी लपलेली असते आणि त्या संधीला शोधून तिचं सौंदर्यात परिवर्तन करायचं असतं; हे आम्हाला अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळीच कळतं म्हणूनच परत परत अशा आपत्तीग्रस्तांना मदत करू वाटते. मग ती कोणत्याही प्रकारे असुदे. त्यांना आपल्याकडून देता आलं तर धन द्यावं नाही जमलं तर मन द्यावं आणि तेही नाही जमलं तर निदान तन तरी द्यावं. धनाच्या बाबतीत कुणी चलन द्यावं म्हणजे आपत्तीग्रस्तांना सुसह्य स्थितीत जगता येईल. ज्यांना चलन जमणार नाही त्यांनी या आपत्तीग्रस्तांची मनोभावे सेवा करावी आणि ज्यांना सेवाही जमत नाही त्यांनी निदान माझ्या एका कवी मित्रानं म्हटल्याप्रमाणे
आलेल्या या संकटात एकेजागी ºहाऊ।
मिळालेला घास, तुकडा सांभाळून खाऊ।
बुडवणारा पूर सगळे एकोप्याने पोहू।
धिटाईने महापुरा ओसराया लावू।
संकटात परसंगाला, तुला मी आधार आणि
मला तू आधार।
जाईल महापूर दादा, जाईल महापूर।।
असा निदान शब्दाचा आधार तरी द्यावा आणि तो मनापासून द्यावा. ही सगळी मदतीचीच रूपे आहेत. आपण ती अवलंबली तर आपल्यालाही समाधान लाभतं. कधीतरी आमच्या मनाला प्रश्न पडतो की हे आम्ही का करायचं तर त्याचं उत्तर एकच आहे की तर ते मानव्याच्या जोपासनेसाठी करायचं. एक तेजस्वी दिवा आपल्यासारखे हजारो दिवे प्रज्वलित करू शकतो आणि जगातील अंधार कमी होऊ शकतो; त्याचप्रमाणे माणसाला माणूस जोडत राहून अवघ्यांच्या जीवनातील अपूर्णांचा अंध:कार कमी करण्यासाठी हे करायचं. वास्तविक नदी गावात येत असताना गटारीचं आणि ओढ्याचं पाणी ज्या सहजतेने आपल्या प्रवाहात स्वीकारते; त्याच भावाने मंदिरातील मोरीतून येणारं तीर्थसुद्धा ती स्वीकारते. आमच्या जगण्यातसुद्धा ही सहजता यावी. आम्ही अशा या आपत्तीग्रस्तांसाठी खूप खूप मदत करावी आणि आमच्या प्रत्येकाच्या अंत:करणात मानवतेचा महापूर यावा आणि तो कधीही न ओसरणारा असावा, एवढीच अपेक्षा.
(लेखक : संत साहित्याचे अभ्यासक व
परिवर्तनशील वक्ते आहेत)

Web Title:  The flood of humanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.