परीक्षेत पहिले येणे म्हणजे यश नव्हे
By Admin | Updated: September 1, 2016 00:45 IST2016-08-31T23:48:52+5:302016-09-01T00:45:33+5:30
जी. डी. यादव : जगात टाकाऊ काहीच नाही; देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये

परीक्षेत पहिले येणे म्हणजे यश नव्हे
कोल्हापूर : आजकाल पालक आणि विद्यार्थीही परीक्षेत पहिले येण्यासाठी धडपडत असतात; पण आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नंबर महत्त्वाचे नाहीत. आज इंटरनेट हे गुरू द्रोणाचार्याच्या भूमिकेत आहे. त्यातून कोणते आणि कसे ज्ञान घ्यायचे हे आजच्या एकलव्याने शिकले पाहिजे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम कराल, त्यात पारंगत होण्याचे ध्येय बाळगा, असे प्रतिपादन मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांनी केले.
दि प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटी व माजी विद्यार्थी संघाच्या वर्धापनदिनानिमित्त बुधवारी आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा पोलिसप्रमुख प्रदीप देशपांडे होते. व्यासपीठावर प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. ना. गोगटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष भूपेंद्र शहा, डॉ. अजित भागवत, विनोद डिग्रजकर, बी. जी. देशपांडे, एस. जी. भोसले, एस. आर. डिंगणकर, उदय सांगवडेकर उपस्थित होते.
यादव म्हणाले, मुलांना चांगले गुण मिळाले की पालक त्यांना झाडावर चढवतात; पण कमी गुण पडले की तेच पाल्यांना सर्वाधिक दु:खी करतात. खरे तर याच काळात पाल्याला आई-वडिलांच्या भक्कम आधाराची गरज असते. आज इंटरनेटद्वारे सगळे जग अभ्यासासाठी खुले झाले आहे. विद्यार्थ्यांना ज्ञान कोठेही, कधीही मिळाले पाहिजे. इंटरनेटचा धोका म्हणजे येथे तुमचे चुकले की तुमचे कान पकडणारा गुरू नाही. त्यामुळे आपला पाल्य कोणते ज्ञान घेत आहे हे पाहण्याची जबाबदारी पालकांची आहे. या जगात टाकाऊ काहीच नाही. आजच्या मुलांना समुपदेशनाची गरज आहे. देशाला पुढे नेण्याची क्षमता तरुणाईमध्ये आहे. यावेळी यादव यांनी माझ्यावतीने शाळेच्या आजी व माजी अशा दोन गुणवंत विद्यार्थ्यांना आपले गुरू गंगातीरकर यांच्या नावे पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा केली.
पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी समारोप केला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक परीक्षेत उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी मयूरी भोपळे हिचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेतील गुणवंत शिक्षक व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बी. जी. देशपांडे यांनी संस्थेचा परिचय करून दिला. उदय सांगवडेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. मा. ना. गोगटे व भूपेंद्र शहा यांनी मनोगत व्यक्त केले. शोभना कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. एम. आर. गोरे यांनी आभार मानले.
पहिलं काम फॉरवर्ड
यादव म्हणाले, आज घरी आलेली मुलं पालकांशी न बोलता फोनवर बोलत बसतात. रात्री झोपल्यानंतर उशाला दोन-दोन मोबाईल असतात. सकाळी उठलं की स्नान, देवाचे नामस्मरण करण्याआधी मोबाईल चेक करतात आणि काही वाचायच्या आधी व्हॉट्स अॅपवर आलेले मेसेजेस फॉरवर्ड करतात. सोशल मीडियाच्या जगातील सगळ्याच गोष्टी खऱ्या नाहीत. आमिषांच्या या जगात हरवायचे नसेल, तर बंधन आवश्यक आहे.