‘प्रधानमंत्री आवास’मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद विभागात प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:01+5:302021-08-26T04:28:01+5:30
स्वत:च्या हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. प्रधानमंत्री आवास योजना, ...

‘प्रधानमंत्री आवास’मध्ये कोल्हापूर जिल्हा परिषद विभागात प्रथम
स्वत:च्या हक्काचा निवारा मिळावा, यासाठी केंद्र व राज्य पुरस्कृत विविध योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, यासह इतर विविध योजनांमधून ग्रामीण नागरिकांना घरे देण्यात येत आहेत. या योजना गतिमान करून घरकुलांच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात २० नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२१ या काळात राज्यात महाआवास अभियान राबविण्यात आले होते.
अपूर्ण असलेली घरकुले, तसेच अद्याप मान्यता न दिलेल्या घरकुल प्रस्तावांना मान्यता देऊन या १०० दिवसांत आठ लाख ८२ हजार १३५ घरकुले राज्यभरात पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला होता. अध्यक्ष राहुल पाटील, कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट प्रशासनाने पूर्ण केले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेची महाआवास अभियान ग्रामीण या विभागीयस्तरीय प्रथम क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. तर तालुका स्तरामध्ये गगनबावडा पंचायत समितीने प्रथम क्रमांक तर राधानगरी पंचायत समितीने तिसरा क्रमांक तर राज्य पुरस्कृत योजनेमध्ये कागल तालुक्याने पहिला क्रमांक पटकावला आहे. प्रकल्प संचालक डॉ. रवि शिवदास यांनी नियोजनबद्ध पद्धतीने या विभागामध्ये जिल्ह्याला अव्वल स्थान मिळवून दिले आहे.