बेशिस्त नागरिकांवर पावणेपाच लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:23 IST2021-05-24T04:23:21+5:302021-05-24T04:23:21+5:30
कोल्हापूर : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या कडक लॉकडाऊनच्या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त लोकांवर जिल्हा पोलीस दलाने रविवारी कारवाई करत ...

बेशिस्त नागरिकांवर पावणेपाच लाखांचा दंड
कोल्हापूर : कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी केलेल्या कडक लॉकडाऊनच्या उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त लोकांवर जिल्हा पोलीस दलाने रविवारी कारवाई करत तब्बल ४ लाख ७३ हजारांवर दंड वसूल केला.
कोरोना महामारीचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामध्ये नागरिकांना रस्त्यावर येण्यास प्रतिबंध केला आहे; पण तरीही उपाययोजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस दलाच्यावतीने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. कडक लॉकडाऊनच्या अखेरच्या दिवशी रविवारी जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली. विनामास्क फिरणाऱ्या ३९३ जणांवर कारवाई करत १ लाख ५ हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला. त्याशिवाय मॉर्निंग वॉकसाठी रस्त्यावर फिरणाऱ्या २७१ जणांना पकडून त्यांना दिवसभर पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले. त्यांच्याकडून १ लाख २ हजार ३०० रुपये दंड वसूल केला. याशिवाय जिल्ह्यात मोटर व्हेईकल ॲक्टप्रमाणे ११८३ वाहनांवर केसेस करत सुमारे २ लाख ५८ हजार ८०० रुपये दंड वसूल केला तसेच ९५ दुचाकी जप्त करुन त्या लॉकडाऊन संपल्यानंतर परत देण्यात येणार आहेत. आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश असताना विनापरवाना सुरू ठेवणाऱ्या सात जणांवर कारवाई करत एकूण सात हजाराचा दंड वसूल करण्यात आला.