कोरोनाशी लढताना - डॉ. मंजिरी घेवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:23 IST2021-04-22T04:23:17+5:302021-04-22T04:23:17+5:30
हा आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली पाहिजे. वातावरणानुसार आहारात बदल आणि व्यायाम केलाच पाहिजे. कोरोनाचा ...

कोरोनाशी लढताना - डॉ. मंजिरी घेवारी
हा आजार होऊच नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सुरुवात केली पाहिजे. वातावरणानुसार आहारात बदल आणि व्यायाम केलाच पाहिजे. कोरोनाचा परिणाम श्वास आणि फुप्फुसावर होतो. त्यापासून वाचण्यासाठी भस्त्रिका, सुदर्शन क्रिया, दीर्घ श्वसन, प्राणायाम असे श्वासाचे व्यायाम केले पाहिजेत. वाफ घेताना पाण्यात घालण्यासाठी स्वेदनसारखे आयुर्वेदिक कीट वापरू शकता. निरगुंडीचा पाला आणि वेखंड घालून पाणी उकळत ठेवा आणि त्याची वाफ घ्या. हेच पाणी तुम्ही फरशी पुसण्यासाठी, दारात सडा मारण्यासाठी, तसेच वस्तू पुसण्यासाठी जंतुनाशक म्हणून वापरू शकता. वाफ घेताना दीर्घ श्वास घेऊन थोडा वेळ रोखून धरा. आयुर्वेदिक उपाययोजनांमध्ये नाकात अनुतेलसारखे औषधी ड्रॉप्स सोडले जातात. काहीच नसेल तर रोज सकाळ, संध्याकाळ गाईचे तूप इअर बड्समध्ये घालून नाकातून फिरवले तरी चालेल. हे झाले कोरोना होऊ नये म्हणून करायच्या उपाययोजना.
आता पाहूया कोरोना झाला तर काय करायचे. पहिली गोष्ट म्हणजे ॲलोपॅथी उपचार तातडीने सुरू करा. कारण हा आजार कमी वेळेत गंभीर रूप धारण करतो. मन शांत ठेवा, हालचालींवर नियंत्रण ठेवा. सूक्ष्म श्वसनाचे व्यायाम करा. कोरोनामुळे मानसिकतेवर मोठा परिणाम होताे. थकवा येतो. काही करू नये असे वाटणे, नैराश्य अशी अवस्था काही काळ येते. त्यातून बाहेर पडण्यासाठी शिरस्त पंचकर्म, पाद्यपूजा, नस्यविधी केला जातो. त्यामुळे थकवा कमी होतो. फुप्फुसाची कार्यक्षमता वाढते. उत्साह वाढतो. हर्मोनल बॅलन्स राहतो. विचारांची क्षमता वाढते. माणूस शांत आणि संतुलित होतो. या काळात अंघोळीच्या पाण्यात कडुलिंब आणि मोठं मीठ घातलं तरी ते विषाणूपासून आपलं संरक्षण करतात. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुढील किमान महिनाभर आहार, विहार, व्यायाम आणि आपली कार्यक्षमता पूर्ववत करण्याच्या उपाययोजना अमलात आणल्या पाहिजेत. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी आयुर्वेदाने काही प्रकारचे काढे सांगितले आहेत. हे काढे वैद्यांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणात घ्या. कारण ते प्रत्येकाच्या प्रकृतीला मानवतीलच असे नाही. आरोग्यदायी आयुष्य जगायचे असो किंवा आजारांचा सामना करताना आयुर्वेद, पंचकर्म ही पारंपरिक संस्कृती मानवी जीवनासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
--
डॉ. मंजिरी घेवारी (लेखिका आयुर्वेद व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
फोटो नं : २१०४२०२१-कोल-मंजिरी घेवारी (कोरोनाशी लढताना)
--