कोडोलीत पाटील विरुद्ध कोरे लढत
By Admin | Updated: July 7, 2015 01:29 IST2015-07-07T01:29:52+5:302015-07-07T01:29:52+5:30
ग्रामपंचायत निवडणूक : यशवंत एकनाथ, भारत पाटील १६ वर्षांनी एकत्र

कोडोलीत पाटील विरुद्ध कोरे लढत
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या कोडोली येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष भारत पाटील, माजी आमदार यशवंत एकनाथ पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विलास पाटील हे गट एकत्र आले आहेत. त्यामुळे या निवडणुकीत तीन पाटील विरुद्ध माजी आमदार विनय कोरे अशी झुंज होणार आहे. या ग्रामपंचायतीमध्ये नेमकी कशी आघाडी होणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायतीच्या १७ सदस्यांसाठी २५ जुलैला निवडणूक होत आहे. आता तिथे कोरे गटाची सत्ता आहे. त्या गटाचे १२ व विरोधी यशवंतदादा पाटील गटाचे पाच सदस्य आहेत. कोरे गट गावच्या राजकारणात अल्पमतात होता. भारतअप्पा पाटील यांनी कोरे यांचे नेतृत्व मानून काम करण्यास सुरुवात केल्यावर स्थानिक राजकारणाचे चित्र बदलले. अल्पमतातील कोरे गट सत्तेत आला. स्वत: पाटील २००२ मध्ये पन्हाळा पंचायत समितीचे सभापती झाले. पुढे २००७ मध्ये ते जिल्हा परिषदेवर निवडून आले. जिल्हा परिषदेच्या २०१२ च्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या चिन्हावर निवडून आल्या. भारतअप्पा पाटील सोबत असल्यामुळे २००० पासून कोरे गटाचे गावच्या राजकारणात वर्चस्व राहिले. या गटाचे नेतृत्व भारतअप्पा पाटील करत होते. परंतु, गेल्या विधानसभा निवडणुकीच्या अगोदरपासून पाटील व कोरे यांच्यात राजकीय वितुष्ट आले. जनसुराज्य पक्षात राहून आपल्याला राजकीय भवितव्य नाही, असे भारतअप्पांना वाटत होते. त्यामुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भारतअप्पा तटस्थ राहिले. स्वाभिमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांच्या माध्यमातून विधानसभेची शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघातील शिवसेनेची उमेदवारी मिळावी, यासाठीही त्यांनी प्रयत्न केले. परंतु, त्यात त्यांना यश आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीला ते पुन्हा कोरे यांच्याशीच संगत करणार की काही वेगळा पवित्रा घेणार, याबद्दल उत्सुकता होती. मात्र, आता दादा गटाशी त्यांनी संधान बांधल्याने कोरे व भारतअप्पा यांच्या राजकीय वाटा वेगळ्या झाल्याचे स्पष्ट झाले.
तालुक्याच्या राजकारणातही पडसाद
भारतअप्पा पाटील, अमर पाटील, डॉ. जयंत पाटील व स्वाभिमानीचे विलास पाटील यांची जागावाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. सर्वांनी एकत्र यायचे हा निर्णय झाला असून, जागावाटप चर्चेतून ठरवू, असे भारतअप्पा पाटील यांनी स्पष्ट केले. या घडामोडींचा तालुक्याच्या राजकारणावरही परिणाम होणार आहे. कोडोली हे कोरे यांचे मूळ गाव. त्यामुळे तेथूनच त्यांच्याविरोधातील राजकारणाला आता विरोध सुरू झाला आहे. यशवंत एकनाथ पाटील व भारतअप्पा हे नातेवाईक आहेत. सोळा वर्षांनंतर ते पुन्हा राजकारणात एकत्र आले आहेत.