शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरावे
By Admin | Updated: December 14, 2014 23:55 IST2014-12-14T21:17:01+5:302014-12-14T23:55:22+5:30
तुकाराम मोरे : वारणनगर येथे विविध पुरस्कारांचे वितरण

शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरावे
वारणानगर : शेतकऱ्यांनी शेती व्यवसायासाठी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यास शेतीचे उत्पन्न वाढविण्यासाठी मोठी मदत होईल, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांनी केले.
येथील श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखाना आणि शेतीपूरक व शेती प्रशिक्षण संस्थेच्यावतीने आयोजित कृषी पुरस्कार समारंभात ते बोलत होते.
यावेळी माजी मंत्री विनय कोरे व कुलगुरू डॉ. मोरे यांच्या हस्ते विविध पुरस्कारांनी शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. बेलवडे हवेली (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील शेतकरी बापूराव रघुनाथ पवार यांना ‘स्व. विलासमामा कोरे कृषी तंत्रज्ञ २०१४’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. वारणा परिसरातील प्रगतशील शेतकरी बाजीराव बच्चे (बच्चे सावर्डे, ता. पन्हाळा), बाबासो संकपाळ (पोखले, ता. पन्हाळा), गुंडू दणाणे (किणी, ता. हातकणंगले), हौसेराव पाटील-चव्हाण (येल्लूर, ता. वाळवा) व सर्जेराव पाटील (करंजवडे, ता. वाळवा) यांना ‘सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
रंजना देशमुख (कोडोली, ता. पन्हाळा), भाग्यश्री जाधव (बहिरेवाडी, ता. पन्हाळा), बाळाबाई पाटील (भादोले, ता. हातकणंगले), विद्या गावडे (शिगाव, ता. वाळवा), लीलाबाई भोसले (चिकुर्डे, ता. वाळवा) या पाच प्रगतशील महिलांना ‘स्व. सावित्रीआक्का कोरे कृषिलक्ष्मी’ पुरस्काराने गौरविण्यात आले.
विनय कोरे म्हणाले, ‘वारणा’च्या माध्यमांतून शेतकरी सभासदांसाठी सातत्याने नवनवीन योजना आणत आहे. यापुढेही शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळून ऊसपिकासह अन्य पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. आर. वाय. खोत यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रतापराव पाटील, व्ही. एस. कोले, बी. जी. सुतार, हिंदुराव तेली, प्रकाश मोरे, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
वारणानगर येथे आयोजित केलेल्या ‘वारणा कृषी प्रदर्शनात’ विविध पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करण्यात आले. माजी मंत्री विनय कोरे व महात्मा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या हस्ते कृषिभूषण पुरस्कार स्वीकारताना बाजीराव बच्चे.