शेतकऱ्यांनी कंपन्या उभाराव्यात
By Admin | Updated: October 3, 2015 01:15 IST2015-10-03T01:15:13+5:302015-10-03T01:15:13+5:30
राजू शेट्टी यांचे आवाहन : डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन

शेतकऱ्यांनी कंपन्या उभाराव्यात
नवे पारगाव : शेतीच्या उत्पादित मालाचा ग्राहक हा शेतकरी असूनही त्यांची व्यापाऱ्यांकडून लूट होते. यासाठी शेतकऱ्यांनी त्यांच्या पातळीवर शेती माल उत्पादन कंपन्या सुरू कराव्यात, असे प्रतिपादन खासदार राजू शेट्टी यांनी केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी अंबप येथे राजेंद्र हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या सभेत खासदार राजू शेट्टी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, डी. वाय. पाटील एज्युकेशनच्या वतीने सुरू असणाऱ्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती व शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणारे शोध-संशोधन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी भर घालतील असा विश्वास व्यक्त करून ते म्हणाले, विभाजन कुटुंब संस्कृतीमुळे शेतीचे तुकडे झाले असल्याने बदलत्या काळाप्रमाणे बदल करून ‘एकत्रित समूह शेती’ पद्धती सुरू करावी. यामुळे उत्पादन खर्च व कष्ट यांची बचत होऊन शेतकरी आर्थिक संकटातून बाहेर पडेल.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी स्वागत केले. सरपंच विश्वनाथ पाटील, बाळासाहेब माने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष विजयसिंह माने यांनी मनोगत व्यक्त केले. तळसंदेच्या सीम बायोटेकचे व्यवस्थापक गुलाबराव धुमाळ यांनी ‘केळी पीक व्यवस्थापन’ तर पुण्याच्या नेटाफीम इरिगेशनचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण देशमुख यांनी आपत्कालीन स्थितीत ऊस शेती मधील ठिबक सिंचन व खत व्यवस्थापन याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी प्रदर्शनातील स्टॉलमधून शेतकऱ्यांनी माहिती घेतली.
यावेळी उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव, तालुका कृषी अधिकारी देवकर, अंबपचे उपसरपंच अल्लाबक्ष मुल्ला, माजी सरपंच उषाताई माने, मनपाडळेचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, अंबपवाडीच्या सरपंच मीनाताई खोत, जिल्हा नियोजन समिती सदस्य वैभव कांबळे, शिवाजी माने, स्वाभिमानीचे विभाग प्रमुख संपतराव पोवार, घुणकीचे माजी उपसरपंच जयसिंग कुरणे, शिवाजी शिंदे, सुधीर मगदूम यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रा. जयवंत जगताप यांनी प्रास्ताविक केले. प्रा. सुधि सूर्यगंध यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. दीपक पाटील यांनी आभार मानले.