डिसेंबरमध्ये जिल्ह्यात शेतकरी मेळावे
By Admin | Updated: November 22, 2014 00:19 IST2014-11-21T21:20:28+5:302014-11-22T00:19:02+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागाचा पुढाकार: औषध फवारणीचे प्रात्यक्षिक दाखविणार

डिसेंबरमध्ये जिल्ह्यात शेतकरी मेळावे
रत्नागिरी : आंबा व काजूवर औषध फवारणीचे प्रात्यक्षिक आणि शेतकऱ्यांचे मेळावे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी पी. एन. देशमुख यांनी दिली. जिल्ह्यात आंबा, काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. मात्र, या पिकावर तुडतुडे, थ्रीप्स अशांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी आंबा, काजूवर औषध फवारणी करण्यात येते. ही फवारणी करताना ते प्रमाणात असणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद कृषी विभागाने उपाध्यक्ष सतीश शेवडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्याचा निर्णय घेतला. जिल्ह्यात आंबा, काजूवरील फवारणीसाठी जिल्हा परिषदेने २० लाख रुपयांची कीटक नाशक औषधे खरेदी करुन ती शेतकऱ्यांना देण्यात आली आहेत.
आंबा, काजूवर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी कृषी विद्यापीठाकडून तांत्रिक मार्गदर्शन करून औषध फवारणीचे व हाताळणीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. हे मेळावे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्यात येणार आहेत. त्यासाठी तालुका कृषी अधिकारी, आत्मा, कृषी अधीक्षक, पीक संरक्षक औषध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि विक्रेते या शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
या मेळाव्यांना जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन देशमुख यांनी केले आहे. शेतकऱ्यांसाठी अशा प्रकारचे मेळावे आयोजित करण्यात आल्यामुळे बागायतीतील नवतंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध होत असल्याने अशा मेळाव्यांची गरज व्यक्त करण्यात येत होती. आता हे मेळावे आयोजित केले आहेत. (शहर वार्ताहर)