शेतकरीच जिल्हा बॅँकेचे तारणहार
By Admin | Updated: August 12, 2014 23:23 IST2014-08-12T21:41:17+5:302014-08-12T23:23:16+5:30
सर्वसाधारण सभेकडे लक्ष : बिगरशेती कर्ज व्यवहारानेच जिल्हा बॅँक तोट्यात

शेतकरीच जिल्हा बॅँकेचे तारणहार
प्रकाश पाटील - कोपार्डे -- जिल्हा बॅँकेन सन २०१३-१४ मध्ये शेतकऱ्यांना वितरीत केलेल्या ११७८.१४ कोटी रुपये कृषी कर्जांपैकी जून २०१४ अखेर १०६२.८५ कोटी रुपये शेतकऱ्यांनी कर्जाची परतावा केला असून याचे वसुलीचे शेकडा प्रमाण ९० टक्के आहे. याऊलट बिगर शेती कर्ज व्यवहारामध्ये असणारा एन.पी.ए पाहिल्यास जिल्हा बॅँकेला तोट्यात घालविण्यात याच संस्था कारणीभूत आहेत, हे स्पष्ट झाले असून जिल्हा बॅँकेला शेतकऱ्यांनीच तारल्याचे शेतकरी सभासदांचे आभार मानन्यात प्रशासकांनी आपले मोठेपण दाखविले आहे.
सन २०१३-१४ सालाकरिता जिल्ह्याच्या पतपुरवठा आराखड्यानुसार जिल्ह्यातील एकुण १८२८.१९ कोटी पीक कर्ज वाटपापैकी जिल्हा बॅँकेने ११३६.११ कोटी रुपये वाटप केले. हा एकुण रक्कमेच्या ६० टक्के आहे. जिल्ह्यातील ३ लाख, तीन हजार २७१ कर्जदार शेतकऱ्यांपैकी २ लाख ३८ रहजार ५३३ शेतकऱ्यांना म्हणजे ७९ टक्के शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेने जिल्ह्यातील विकास सेवा सोसायट्यांच्या मार्फत कर्जपुरवठा केलेला आहे. सन २०१३-१५ या सालामध्ये शेती कर्जाची वसुल पात्र रक्कम ११७८.१४ कोटी रुपयांपैकी ३० जून २०१४ अखेर १०६२.८५ कोटी रुपये कृषी कर्जाचा परतावा शेतकऱ्यांनी केला आहे. शेकडा वसुलीचे प्रमाण ९० टक्के आहे. मात्र बिगरशेती कर्ज व्यवहारामद्ये असणारा एनपीए चिंताजनक असून मार्च २०१४ अखेर हे एन.पी.एन चे प्रमाण १३.३८ टक्के इतके आहे. मार्च २०१४ अखेर एकुण कर्ज येणे बागी १८१८.७७ कोटी पैकी एन. पी.रक्कम २४३.२० कोटी रुपये आहे. यात साखर कारखाने, मार्केटिंग प्रोसेसिंग संस्था आणि विकास सेवा संस्था व नागरी पत संस्थांची मोठी संख्या आहे. प्रगतीला या संस्थांचाच मोठा अडसर आहे.