जोतिबावर पायाभूत सुविधांसाठी कसरत

By Admin | Updated: April 18, 2016 01:10 IST2016-04-17T21:02:59+5:302016-04-18T01:10:48+5:30

उत्पन्न ४३ लाख, खर्च ७३ लाख जमा खर्चात ३० लाखांची तफावत ग्रामपंचायत प्रशासन मेटाकुटीला

Exercise for infrastructure at Jyotibah | जोतिबावर पायाभूत सुविधांसाठी कसरत

जोतिबावर पायाभूत सुविधांसाठी कसरत

जोतिबा : श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील ग्रामपंचायतीला पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. ग्रामपंचायतीला वर्षाकाठी ४३ लाखांचे उत्पन्न, तर खर्च ७३ लाखांवर जात असल्याने जमा खर्चामध्ये
३० लाखांची तफावत भरून काढताना ग्रामपंचायत प्रशासन मेटाकुटीला आले आहे. नळ पाणीपुरवठा योजना ही आता पांढरा हत्ती ठरत आहे.श्री क्षेत्र जोतिबा डोंगरला वर्षाकाठी ७० ते ८० लाख भाविक पर्यटक भेट देतात. वर्षभरात दोन मुख्य यात्रा, सन, उत्सव, नगरदिंडीला येणाऱ्या भाविकांना पायाभूत सोयी सुविधा पुरविताना स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनावर मोठा ताण पडतो. पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती यांचा यात्रा व्यवस्थापनावर खर्च वाढत आहे. ग्रामपंचायतीला उत्पन्नाचे स्रोत कमी आहेत. यात्रा करातून मिळणारे उत्पन्नही अपुरे पडत आहे. मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२४ मधील ५ ख ३ नुसार ग्रामपंचायत कर व फी शुल्क नियम १९६० नुसार भाग ४ नुसार सन २००५-०६ पासून माणसी कर घेण्यास सरुवात झाली. प्रथम प्रती माणसी एक रुपया यात्रा कर घेतला जात होता. सन २०१२-१३ पासून हा प्रती माणसी दोनरुपया घेतला जाऊ लागला. नळ पाणीपुरवठा, वीज बिल, दिवाबत्ती, स्वच्छता या खर्चासाठी यात्रा कराची तरतूद शासनाने केली; पंरतु हेच उत्पन्न आता ‘नाकापेक्षा मोती जड’ ठरत आहे. यात्रा करातून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी २२ ते २३ लाखांपर्यंत उत्पन्न मिळते. यातून फक्त नळ पाणीपुरवठा वीज बिलाची पूर्तता होते. जोतिबा डोंगरावर सध्या १२ कि.मी. अंतरावरील केर्ली गावातून जाणाऱ्या कासारी नदीतून पाणीपुरवठा चालू आहे. २४ तास पाणी उपसा असल्याने महिन्याला वीज बिल २ ते ३ लाखांच्या आसपास येते. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना म्हणजे ग्रामपंचायतीला गैरसोयीची होत आहे. घरपट्टी, आरोग्य कर, दिवाबत्ती कर, पाणीपट्टी करातून ग्रामपंचायतीला वर्षाकाठी २१ लाख उत्पन्न मिळते. यामध्ये २४ कर्मचाऱ्यांचा पगार, शौचालय सफाई, दिवाबत्ती साहित्य, रस्ते व गटर्स स्वच्छता, अंत्यविधी साहित्य, कार्यालय खर्च, नळ पाणीपुरवठा देखभाल दुरुस्ती, यात्रा व्यवस्थापन साठी ४० ते ५० लाखांपर्यंत खर्च होतो. ग्रामपंचायतीला एकूण ४३ लाखाच्या आसपास वर्षाला उत्पन्न मिळते. खर्च मात्र ७३ लाखांच्या आसपास होतो. जमाखर्चामध्ये ३० लाखांची तफावत असल्याने भाविकांना सोयीसुविधा पुरविताना ग्रामपंचायतीला मोठी अडचण होत आहे. (वार्ताहर)
देवस्थान समिती : २२ लाख ५0 हजार येणे
पश्चितम महाराष्ट्र देवस्थान समिती कडून ग्रामपंचायतीला २२लाख ५० हजार येणे बाकी आहे. हा निधी अजूनही मिळालेला नाही. अधिक सुविधा व मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्नाचे स्रोत वाढविणे गरजेचे असल्याचे सरपंच रिया सांगळे यांनी सांगितले.

Web Title: Exercise for infrastructure at Jyotibah