दहावी, बारावीच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:23 IST2021-04-13T04:23:54+5:302021-04-13T04:23:54+5:30

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर विभागातील दहावी, बारावीच्या एकूण २ लाख ५९ ...

Examinations of 2.5 lakh students of Class X and XII postponed | दहावी, बारावीच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर

दहावी, बारावीच्या अडीच लाख विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर

कोल्हापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कोल्हापूर विभागातील दहावी, बारावीच्या एकूण २ लाख ५९ हजार ६२८ विद्यार्थ्यांची परीक्षा लांबणीवर पडणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याबाबतच्या सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालकांतून संमिश्र प्रतिक्रिया सोमवारी व्यक्त झाल्या.

कोरोनामुळे शासनाने इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द केली. त्यामुळे दहावी, बारावीच्या परीक्षांचे काय होणार याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागून राहिले होते. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्यानुसार बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मेदरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार होती. त्यासाठी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एकूण २,५९,६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयांमध्ये सराव परीक्षा सुरू होत्या. कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राज्य सरकारने या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय सोमवारी दुपारी जाहीर केला. या निर्णयानुसार आता बारावीची परीक्षा मे अखेरीस, तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आहे.

विद्यार्थी म्हणतात?

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी हिताच्यादृष्टीने सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे. आधी ऑनलाइन, मग ऑफलाइन असे आमचे दहावीचे शिक्षण झाले आहे. परीक्षा पुढे गेल्याने अभ्यासाला आणखी वेळ मिळाला आहे.

-पूर्वा मोहिते, कसबा बावडा.

बारावीची परीक्षा लांबणीवर पडल्याने आमच्या शिक्षण आणि पुढील सर्व नियोजनावर परिणाम होणार आहे. परीक्षा आता झाली असती, तर बरे झाले असते. पण, कोरोनामुळे शासनाने घेतलेला निर्णय योग्य आहे.

-फैज सय्यद, बोंद्रेनगर.

पालक म्हणतात?

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने सध्याचा निर्णय योग्य आहे. सरकारने पुन्हा परीक्षा पुढे ढकलू नयेत. आता ठरल्यानुसार जूनमध्ये परीक्षा घ्यावी.

-रेश्मा पठाण, शाहुपुरी.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्याचा विचार करता एप्रिल, मे मध्ये परीक्षा होणे आवश्यक होते. मात्र, कोरोना पुन्हा वाढू लागल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे देखील महत्त्वाचे आहे.

-महादेव पाटील, शिरोली.

चौकट

बारावीची प्रवेशपत्र नव्याने मिळणार

महाविद्यालयांकडून बारावीच्या काही विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे मिळाली आहेत. आता मे अखेरीस ही परीक्षा होणार असल्याने या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे बदलून मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना सध्या प्रवेशपत्रे मिळाली आहेत. त्यांना ती महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. दरम्यान, याबाबत शासन आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे कोल्हापूर विभागीय सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले.

कोल्हापूर विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात

दहावीचे विद्यार्थी : १३८४५९

बारावीची विद्यार्थी : १२११६९

Web Title: Examinations of 2.5 lakh students of Class X and XII postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.