दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतोय खड्ड्यांवरच
By Admin | Updated: November 11, 2014 00:05 IST2014-11-10T21:49:49+5:302014-11-11T00:05:47+5:30
दिवसेंदिवस खड्ड्यात वाढच : रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गाची अवस्था

दरवर्षी कोट्यवधींचा खर्च होतोय खड्ड्यांवरच
राजाराम कांबळे -- मलकापूर -दरवर्षी रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधींचा खर्च करूनही या रस्त्यावरील खड्ड्यात मात्र दिवसेंदिवस वाढच होत आहे. वाहनधारक व नागरिक यांना मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाकडून अनेक करांची आकारणी केली जाते; पण शासकीय अधिकारी व ठेकेदारांच्या साठ्यालोठ्यातून जनतेकडून घेतलेल्या पैशांची कशी लूट केली जाते, याचे जिवंत उदाहरण कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिल्यास आपणाला दिसेल.
कोकणातील रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर, देवरुख, जयगड, गणपतीपुळे, आदी पर्यटनस्थळांना व माल वाहतुकीसाठी कमी वेळेत व कमी खर्चात पोहोचण्यासाठी कोल्हापूर-रत्नागिरी रस्त्याकडे पाहिले जाते. एवढेच नाही, तर गोव्याकडे पाचालमार्गे जाण्यासाठी जवळचा मार्ग आहे. नाणीजसारख्या माध्यमिक शिक्षणाकडे याच मार्गावरून जाता येते. मुंबईला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा समजला जातो. एवढ्या महत्त्वाच्या मार्गावर राष्ट्रीय महामार्ग व रस्ते विकास महामंडळाकडून अक्षम्य दुर्लक्ष झालले दिसते; पण या रस्त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्यावरील खड्ड्यांत वाढच होत आहे.
जवळजवळ २०० वळणांचा व झाडा-झुडूपांनी वेढलेला हा निसर्गरम्य कोल्हापूर-रत्नागिरी महामार्ग अतिक्रमणाच्या विळख्यात जात असताना महामंडळ मात्र डोळे असून, आंधळ्याचे सोंग घेत असल्याचे दिसत आहे. या मार्गावरील बांधकाम विभागाने लावलेले दिशादर्शक फलक, निवारा शेड गायब होत आहेत. तर रस्त्यावर काहींनी पक्की बांधकामे केली आहेत. मलकापूर ते आंबा दरम्यान नवीन केलेली साईडपट्टी खचली आहे. बांबवडे येथील पुलाचे काम रेंगाळलेले आहे. तर जुळेवाडी येथील मोरीचा पूल गायब आहे. अधिकाऱ्यांनी कागदावरच पूल बांधल्याचे दाखवून सुमारे ४० लाखांचा ढपला पाडला आहे. सदर अधिकाऱ्यांची चौकशी सुरू आहे.
जनतेने कर रूपाने आपला पैसा सरकारी तिजोरीने जमा करावयाचा व शासकीय अधिकारी व कंत्राटदार यांनी साठेलोटे करीत तो लुटायचा, हेच चित्र पाहायला मिळते. मलकापूर-वारुळ येथील नदीवरील पुलाला सुमारे १३० वर्षे झाली आहेत. मात्र, अधिकाऱ्यांनी त्याकडे कानाडोळा केला आहे. नवीन पूल बांधण्याची मागणी वाहनधारकांतून होत आहे.
या मार्गावरून वारणा, विश्वास, उदय, दत्त, निनाई, आदी साखर कारखान्यांची ऊस वाहतूक सुरू होणार आहे. याच मार्गावरून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, बॉक्साईट वाहतूक, परिवहनच्या एस. टी. बसेस, ट्रॅव्हल कंपन्यांच्या आराम बस यामुळे या रस्त्यावर चोवीस तास रहदारी जाम असते. अनेकवेळा अपघात हे केवळ खड्डा चुकविणे व वेड्यावाकड्या वळणांमुळे घडले आहेत. त्यामुळे अनेक वाहनधारकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. नवीन शासनाने यामध्ये लक्ष घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
आंदोलनाचा इशारा
येत्या पंधरा दिवसांत या मार्गाचे डांबरीकरण करावे, अन्यथा मलकापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष राजू प्रभावळकर यांनी दिला आहे.
कागदोपत्री खर्च
शाहूवाडी तालुक्यातील भेरेवाडी ते जुळेवाडी खिंडीतील पुलाचे काम न करता येथील अधिकाऱ्यांनी सुमारे ४० लाख रुपये कागदोपत्री खर्च दाखविला आहे. येथे मोठा भ्रष्टाचार झाला आहे, असे सेनेचे तालुकाप्रमुख दत्ता पोवार यांनी सांगितले.