सोनाळी येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:30 IST2021-09-14T04:30:27+5:302021-09-14T04:30:27+5:30
निवास वरपे लोकमत न्यूज नेटवर्क म्हालसवडे : करवीर तालुक्यातील सोनाळी या छोट्याशा खेडेगावात गेल्या त्र्याहत्तर वर्षांपासून रंगविरहित शाडू ...

सोनाळी येथे पर्यावरणपूरक गणेशोत्सव
निवास वरपे
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हालसवडे : करवीर तालुक्यातील सोनाळी या छोट्याशा खेडेगावात गेल्या त्र्याहत्तर वर्षांपासून रंगविरहित शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रत्येकाच्या घरी बसविल्या जातात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या या गावातील तरुण मंडळांच्या गणेशमूर्तीही शाडू मातीच्याच आहेत. संपूर्ण महाराष्ट्राने आदर्श घ्यावा असा येथील गणेशोत्सव पर्यावरणपूरक होत आहे.
सोनाळी या गावच्या ग्रामदैवत धाकेश्वराला गावात रंगीत गणपती बसविलेला चालत नाही, अशी आख्यायिका आहे. देवाचा कोप होऊ नये या धार्मिक भीतीपोटी ग्रामस्थ आपल्या घरी रंगीत अथवा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बसवीतच नाहीत. धाकेश्वर व जय शिवराय या दोन्ही तरुण मंडळांनी गेली चोवीस वर्षे सार्वजनिक गणेशोत्सव इको फ्रेण्डली व पर्यावरणपूरक असा साजरा करण्याची प्रथा चालविली आहे.
ग्रामपंचायत प्रशासन व ग्रामस्थांच्या वतीने शासकीय नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. पारंपरिक रीतिरिवाजानुसार कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर मर्यादित लोकांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. डॉल्बीमुक्ती व गणेशोत्सवानंतर निर्माल्याची सुव्यवस्थित विल्हेवाट लावण्याची प्रथा येथील ग्रामस्थांनी अखंडित पाळली आहे.
‘शाडू मातीच्या गणेशमूर्ती पुजण्याची प्रथा सोनाळी गावात अखंडित सुरू आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याकरिता आम्ही विशेष खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतो. पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त असा गणेशोत्सव साजरा करण्याची आमच्या गावची प्रथा संपूर्ण राज्यातील नागरिकांनी अवलंबायला हवी. - मोहन पाटील, सरपंच, सोनाळी
फोटो : सोनाळी (ता. करवीर) येथील धाकेश्वर व जयशिवराय तरुण मंडळांच्या गणेशमूर्ती.